धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव  जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‌‘हरित धाराशिव अभियान 2026' ची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,या अभियानाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाने निसर्गाच्या विविध आव्हानांवर मात करत तब्बल 35 लाखांहून अधिक दर्जेदार रोपांची निर्मिती केली आहे.

मागील वर्षी 2025 मध्ये राबविण्यात आलेल्या ‌‘हरित धाराशिव अभियान' अंतर्गत एकाच दिवशी 17 लाख तर संपूर्ण पावसाळ्यात तब्बल 32 लाख रोपांची यशस्वी लागवड करण्यात आली होती.या मोहिमेत सामाजिक वनीकरण विभागाने प्रमुख पुरवठादार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती.मात्र,2025 च्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात नवीन रोपवाटिका सुरू करण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध नव्हते.अशा प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हाधिकारी श्री.पूजार यांनी 2026 च्या पावसाळी वृक्षलागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागास 25 लाख रोपे निर्मितीचे आव्हानात्मक उद्दिष्ट दिले होते.


स्थानिक तंत्रज्ञानाच्या बळावर यश

नोव्हेंबरपर्यंत निसर्गाची साथ नसतानाही सामाजिक वनीकरण विभागाने कल्पकता आणि स्थानिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून हे आव्हान यशस्वीपणे पेलले.बियांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी विविध अभिनव प्रयोग करण्यात आले.यामध्ये स्थानिक स्तरावर छोटे पॉली हाऊस उभारणे,रोपांच्या पिशव्यांमध्ये आवश्यक उष्णता निर्माण व्हावी यासाठी कोंबडी खताचा वापर करणे,तसेच मातीच्या मिश्रणात विशिष्ट खतांचा समावेश करून उगवण क्षमता वाढविणे अशा उपाययोजनांचा समावेश होता.

या प्रयोगांमुळे विभागाने केवळ 25 लाखांचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही,तर ते मागे टाकत 35 लाखांहून अधिक गुणवत्तापूर्ण रोपे तयार करण्याचा विक्रम साधला आहे.


60 हून अधिक स्थानिक व दुर्मिळ प्रजातींचा समावेश

धाराशिव सामाजिक वनीकरण विभागाच्या अखत्यारीतील सर्व तालुक्यांमध्ये एकूण 19 रोपवाटिका कार्यरत आहेत.प्रत्येक तालुक्याच्या भौगोलिक आणि पर्यावरणीय गरजा लक्षात घेऊन येथे रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.कडुनिंब, चिंच,पिंपळ,वड यांसह 60 पेक्षा अधिक स्थानिक वृक्षप्रजातींना प्राधान्य देण्यात आले आहे.विशेष म्हणजे,निसर्गातून हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मिळ,संकटग्रस्त व संरक्षित प्रजातींच्या रोपांची निर्मितीही अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली असून, जैवविविधतेच्या संवर्धनासाठी हा महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे.


15 जूनपासून ‌‘वनमहोत्सव : सर्वांसाठी रोपे उपलब्ध

येत्या 15 जून ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत जिल्ह्यात ‌‘वनमहोत्सव' साजरा करण्यात येणार आहे.या कालावधीत सामाजिक वनीकरण विभागाच्या सर्व 19 रोपवाटिकांमधून नागरिक, सामाजिक संस्था तसेच शासकीय कार्यालयांना अत्यंत किफायतशीर शासकीय दरात रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक वनीकरण, विभाग,धाराशिव यांनी केले आहे.


“जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा हरित करण्यासाठी आमचा विभाग पूर्णपणे सज्ज आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आमच्या पथकाने 35 लाखांहून अधिक उच्च दर्जाची रोपे तयार केली आहेत.नागरिकांनी यंदाच्या पावसाळ्यात वनमहोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होत वृक्षलागवडीच्या चळवळीत योगदान द्यावे,असे आवाहन सामाजिक वनीकरण विभाग,धाराशिव यांनी केले आहे.” हरित धाराशिव अभियान 2026“ मुळे जिल्ह्यात केवळ वृक्षसंवर्धनालाच चालना मिळणार नसून पर्यावरण संतुलन, जैवविविधता संवर्धन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या दिशेनेही एक मोठे पाऊल उचलले जात आहे.

 
Top