कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रस्त्यावर पडलेल्या तीन मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हे खड्डे चुकवताना अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली होती. मात्र नगर परिषदेच्या कारवाईची वाट न पाहता कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांनी पुढाकार घेत समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली.

वाहतूक कमी असलेल्या रात्रीच्या वेळेत, सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी खाजगी मिक्सर बोलावून घेत रस्त्यावरील तीनही धोकादायक खड्डे बुजवून घेतले. त्यामुळे वाहनचालक, नागरिक आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, या सामाजिक भावनेतून पोलीस निरीक्षक शेख यांनी ही तत्परता दाखवली. त्यांच्या या कृतीमुळे प्रशासनातील संवेदनशीलता आणि समाजाभिमुख दृष्टीकोनाचे दर्शन घडले.

पोलीस निरीक्षक शकील शेख यांनी केलेल्या या लोकहिताच्या कामाचे कळंब शहरात सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “कर्तव्याच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काम करणारा अधिकारी“ अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे संभाव्य अपघातांचा धोका टळला असून वाहनधारकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

 
Top