धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे आतोनात नुकसान झाले. सोयाबीन, मुग उडीद, मका, तुर, साळ, तीळ, कापुस ऊस इत्यादी खरीप पिके या अतिवृष्टीत अक्षरशः वाहुन गेली. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे शासनाने तातडीने पावले उचलून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कोळगे यांनी पुढे म्हटले आहे की,जिल्हयासह इतर ठिकाणी पुढच्या दीड महिन्याच्या कालावधीत सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांनीही लक्ष घालून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाईची मदत मिळण्याची प्रक्रिया सुरु करावी, जेणे करून शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाला तरी हातभार लागेल अशी मागणी कोळगे यांनी ई मेलद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.