धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सकल मराठा भगिनींनी पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचे निवेदन दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत असून, समाजामध्ये तीव्र भावना निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे. जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आंदोलन हे शांततेत आणि लोकशाही मार्गाने सुरू असल्यामुळे शासनाने तातडीने यावर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनामध्ये मुंबई येथे जमलेल्या लाखो आंदोलनकर्त्यांसाठी पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय मदत व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवावी. शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे सहानुभूतिपूर्वक पाहून त्वरीत निर्णय घ्यावा. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर अलका हनुमंत गोरखर, किरण परशुराम निंबाळकर, माया सखाराम चव्हाण, पूजा पाटील, अलका प्रकाश मगर, देवकन्या गाडे, शशिकला सुरेश पाटील कांचन किरण भंडारे,शारदा वसंत कोल्हाल, चिमणा ताई भीमराव जाधव, शालिनी सुभाषराव सुरवसे, शारदा वसंत कोल्हाल, चिमणा ताई जाधव,आदींसह एकूण अकरा महिला भगिनींच्या स्वाक्षऱ्या आहेत. सकल मराठा भगिनींच्या या पावलामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला आणखी बळ मिळाले असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे.
