धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील हजारो युवक स्वयंरोजगारातून यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. त्या माध्यमातून शेकडो कुटुंबियांना मोठा आर्थिक आधार लाभला आहे. समाजातील इतर गरजू घटकांनीही राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यायला हवा. भविष्यातील मोठ्या संधी पदरात पाडून घेण्यासाठी युवक आणि युवतींनी नोकरीचा अनुभव गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्यामध्ये व्यवसायाची कौशल्य निर्माण होतील, जेणेकरून त्यातून आपले कुटुंबही आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल. होतकरू तरुणांना सर्वतोपरी मदत करण्यास आपण तयार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन तुळजापूर येथील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवारी करण्यात आले होते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या उपक्रमामध्ये शेकडो युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि नियोजन विभागाच्या ‘मित्र'संस्थेचे उपाध्यक्ष राणाजगजीतसिंह पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, तहसीलदार अरविंद बोळंगे, जिल्हा कौशल्य विभाग सहाय्यक आयुक्त संजय गुरव, जिल्हा प्रशिक्षण अधिकारी प्रवीण आवताडे, तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजनकर, तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यास दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा, पदवीधर, तसेच अभियांत्रिकी, फार्मसी आणि तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राज्यभरातील 32 हून अधिक मान्यताप्राप्त कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला.