धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातून जाणारे सर्वच रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. संबंधित यंत्रणांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी 7 ऑगस्ट रोजी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयासमोरील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
शहरातील सर्वच रस्ते सध्या मोठ्या खड्ड्यांनी भरलेला आहे. या मार्गालगत शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, शासकीय कार्यालये असल्यामुळे प्रचंड वर्दळ असते. मात्र रस्त्यावर पावसाचे पाणी साचून खडी उखडली असून, खड्ड्यांमुळे अनेकजण अपघातग्रस्त होत आहेत. दुर्दैवाने एका तरुणाचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक कायमचे अपंग झाले आहेत.
विशेष म्हणजे या रस्त्याच्या काम महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (मुंबई) यांच्यामार्फत 09 ऑक्टोबर 2024 रोजी कंत्राटदाराशी करार करून मंजूर झाले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी भूमिपूजनही केले होते. परंतु या कामाला नऊ महिने झाले तरी अद्याप सुरुवात झालेली नाही. वाहनचालकांना मणक्याचे विकार जडत आहेत, वाहनांचे मोठे नुकसान होत आहे व मानसिक त्रास वाढला आहे.
शहरातील सर्व रस्त्यांची कामे सुरू करावेत, अन्यथा 7 ऑगस्टपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. या निवेदनावर शहाजी भोसले, प्रशांत पाटील, विनोद वीर, दौलत निपाणीकर, संतोष हंबीरे, रवी वाघमारे, शेखर घोडके, उमेश राजेनिंबाळकर, रोहित बागल, सोमनाथ गुरव, सिद्धार्थ बनसोडे, बाबा मुजावर, तुषार निंबाळकर, मिनिल काकडे, आदित्य पाटील, अभिराज कदम, राणा बनसोडे, महादेव माळी, शौकत शेख, राकेश सुर्यवंशी, बंडू आदरकर, पंकज पाटील, ॲड. तनुजा हेड्डा,सुमित बागल आदी नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.