धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात 20 मेपासून संततधार मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील भूम, कळंब, उमरगा, तुळजापूर तालुक्यातील 384 हेक्टर फळबागांसह कांदा पिकाला फटका असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने दिला आहे. यमाध्ये उन्हाळी भुईमूग, मूग, टरबूज, केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
21 ते 30 मे दरम्यान जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाने कांदा, उन्हाळी मूग, भुईमुग, केळी व फळपिकांचे नुकसान झाले. जिल्हा कृषी विभागातर्फे सर्व्हेक्षणात भूम, तुळजापूर, कळंब, उमरगा तालुक्यात हे नुकसान झाले आहे. भूम तालुक्यातील नुकसानीत लिंबू, कांदा, आंबा बागांसह केळी व डाळींब बागांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील द्राक्ष बागांचा हंगाम जवळपास संपला आहे. त्यामुळे द्राक्षांसह आंबा उत्पादकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. कांदा, कोथिंबीरसह इतर पालेभाज्या, फळभाज्यांना पावसाचा फटका बसला आहे.
तुळजापूर शहरासह परिसरास गुरुवारी राञी वादळवा-यासह झालेल्या अवकाळी मुसळधार झोडपुन काढले. या पावसात मोरडा येथील तळे फुटुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच शहरातील अनेक घरात पाणी शिरले. या पावसाचा भाविकांसह शहरवासियांंना शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.
30 मे पर्यत 298 मिमी पाऊस
धाराशिव जिल्ह्यात 30 मे 2025 पर्यंत सरासरी 298.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये धाराशिव 282 मिमी, तुळजापूर 316.4 मिमी, परंडा 289.7 मिमी, भूम 347.1 मिमी, कळंब 284.3 मिमी, उमरगा 302.4 मिमी, लोहारा 287.2 मिमी, वाशी 268.7 मिमी याप्रमाणे पाऊस झाला आहे.
नुकसान झाल्यानंतर पंचनामा
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा नुकसान झाल्यानंतर होत आहे. तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांचा प्रत्येक तालुक्यासंदर्भात 2 जूनपर्यत नुकसानीचा फायनल अहवाल आल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी किती हेक्टर नुकसान झाली आहे यांचा सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे 5 जून पर्यंत जाईल.
रविंद्र माने
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव