धाराशिव (प्रतिनिधी)-  आपल्या राज्य सरकारने अंमली पदार्थाबाबत 'झिरो टॉलरन्सचे' धोरण अंमलात आणण्याचे निश्चित केले आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यासाठी राज्यभरातील शाळा,महाविद्यालयात “अँटी नार्कोटिक्स क्लब“ स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. आदरणीय फडणवीस साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजमध्ये “अँटी नार्कोटिक्स क्लब“ सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना यापूर्वीच सूचित केले आहे. जिल्ह्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही त्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. प्राप्त सामाजिक परिस्थितीचे गांभीर्य ध्यानात घेऊन जिल्हा प्रशासनही याबाबत आता तत्परतेने योग्य ती पाऊले उचलत असून लवकरच याची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा मित्र चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील तरुण पिढीला या गंभीर संकटातून वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अंमली पदार्थ विरोधी मोठी मोहीम उघडली आहे.तरुण पिढीमध्ये व्यसनांचे वाढते प्रमाण पाहता याला वेळीच पायबंद घालण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील महाविद्यालयामध्ये ‌‘अँटी नार्कोटिक्स क्लब' स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. धाराशिव जिल्ह्यात देखील आपण केवळ ड्रग्ज नव्हे तर इतर सिगारेट, मद्य यासारख्या विविध घातक व्यसनांच्या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

 
Top