धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या चार वर्षापासून तुळजापूरमध्ये ड्रग्ज पावडर सापडण्यास सुरूवात झाली आहे. ड्रग्ज प्रकरणात तुळजापूरची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. त्यामुळे सोयरीक जमवताना सुध्दा पाहुणेरावळे विचार करीत आहेत. पोलिस विभाग मात्र मुख्य आरोपी सोडून इतरांना पकडत आहेत. त्यामुळे आजही तुळजापूरमध्ये ड्रग्ज पावडरच्या पुड्या मिळत आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी पकडणे महत्वाचे आहे. असे मत धाराशिव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
रविवार दि. 16 मार्च रोजी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, अमोल कुतवळ, खलील सय्यद सर आदी उपस्थिती होते. पुढे बोलताना ॲड. धीरज पाटील यांनी ड्रग्ज प्रकरणात पकडलेले आरोपी हे भाजपाशी संबंधित आहेत. या आरोपीच्या गावातून विधानसभा निवडणुकीत लिड आहे. येथे जात, पात, पक्ष यांचा संबंध नाही. परंतु काही लोक यात राजकारण आहेत. त्यामुळे या ड्रग्ज प्रकरणात कडक कारवाई होणे आवश्यक आहे.
सीडीआर तपासा
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एसआयटी नेमून सीडीआर तपासल्यास मुख्य आरोपी सापडतील असे सांगून ॲड. पाटील यांनी भावी पिढी शिल्लक ठेवायची असेल तर सरकारने स्पेशल टीम नेमणे आवश्यक आहे. लोक प्रतिनिधींनी या प्रकरणात आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. पालकमंत्र्यांनी 72 तासाची मुदत दिल्यानंतर लहानसाहान आरोपी पकडले गेले. परंतु मुख्य आरोपी मोकाट असून, या संदर्भात आपण लवकरच राज्याचे गृहमंत्री यांना भेटणार आहोत. जर या प्रकरणात सरकारने लक्ष न घातल्यास सर्व पक्षीय, सामाजिक संघटनासह जनआंदोलन उभा करणार असल्याचा इशाराही धीरज पाटील यांनी दिला.