धाराशिव (प्रतिनिधी)- या वर्षातील संभाव्य पाणी व चारा टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
28 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील संभाव्य पाणी व चारा टंचाई संदर्भात आयोजित आढावा बैठकीत पुजार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव,पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पी.आर.पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी खंडेराव सराफ,जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन सरवदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एस. एम. कुलकर्णी ,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाय. बी. पुजारी, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.आवटे,कृष्णा मराठवाडा बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी एम.एम.नाईक व जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या श्रीमती एम.आर. डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका/नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
पूजार पुढे म्हणाले की, ज्या विहिरींमध्ये गाळ आहे, तो गाळ काढण्याचे काम तसेच नादुरुस्त असलेल्या विंधन विहिरी दुरुस्तीची काम तातडीने हाती घ्यावी. संबंधित यंत्रणांनी एकत्र बसून भूजल पातळीत तसेच पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. तसेच यावर्षी वृक्ष लागवड मोहीम प्रभावीपणे राबवावी असे त्यांनी सांगितले. डॉ.घोष म्हणाले की,मागील वर्षी ज्या गावांमध्ये पाणीटंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्या गावात आतापासूनच दक्षता घ्यावी. नादुरुस्त हातपंप दुरुस्त करून घ्यावे असे त्यांनी सांगितले. 20 व्या पशु गणनेनुसार जिल्ह्यात 7 लक्ष 90 हजार 399 पशुधन असून प्रतिदिन या पशूसाठी 3089 मॅट्रिक टन इतक्या वैरणाची आवश्यकता असल्याची माहिती डॉ.पुजारी यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात 46 टक्के पाणीसाठा उपलब्ध
सन 2024 मध्ये जिल्ह्यात एकूण सरासरी 120 टक्के पाऊस झाला असून सीना कोळेगाव या मोठ्या प्रकल्पात सध्या 57 टक्के,17 मध्यम प्रकल्पात 52 टक्के आणि 208 लघु प्रकल्प 40 टक्के असा एकूण 46 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी जिल्ह्यात 103 गावात 153 टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.500 गावात 854 विहीरी व विंधन विहिरी अधिग्रहित करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती सरवदे यांनी यावेळी दिली.