धाराशिव (प्रतिनिधी)- पी. एम. कुसुम योजना, मुख्यमंत्री मागेल त्याला सोलर पंप असेल किंवा महावितरण विभागाच्या धोरण नसलेल्या कारभाराने शेतकरी कंगाल होत आहेत तर कंपन्या मालामाल होत आहेत. अशी टिका शिवसेना उबाठा गटाचे आमदार कैलास पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर आमदार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आजच्या बैठकीमध्ये दहा महिन्यापूर्वी नोंदणी करूनही सौर पंप मिळत नाहीत म्हणून शेतकरीही आक्रमक झाले होते. कुसुम योजनेमध्ये आतापर्यंत सात हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. पण त्यातील तीन हजार तीनशेहुन अधिक शेतकऱ्यांना पैसे भरून व मुदत संपूनही सोलर पंप बसविलेला नसल्याच समोर आलं आहे.
यामध्ये काम पूर्ण करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडवणूक करणे, कामासाठी आवश्यक मुरूम, खडी आदी साहित्य आणायला लावणं असे प्रकार होत आहेत. साधारण 120 दिवसात नियमानुसार सोलर पॅनल बसवणे बंधनकारक आहे. अन्यथा एजन्सीकडून दंड वसूल करण्याची तरतूद आहे. अनेक प्रकरणात कामाच्या रक्कमेपेक्षा दंड अधिक असल्याचे दिसून आले.
मागेल त्याला सोलर पंप योजना तर निव्वळ फोल ठरत असल्याचे वास्तव आहे. यामध्ये 55 हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील तीन हजार अर्जाची छानणी झाली आहे. तर त्यातील सातशे शेतकऱ्यांकडून पैसे भरून घेण्यात आले आहेत. पैसे भरले असले तरीही अजून एजन्सीची निवडच केली नसल्याच निदर्शनास आले. यामुळे एकही सोलार पंप पैसे भरूनही मिळालेला नाही. निवडणुकी अगोदर घोषणा करून शेतकऱ्यांचे पैसे घेतले पण नंतरच वास्तव हे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक केल्याचं दिसून येऊ लागलं आहे. अशी प्रतिक्रिया आमदार पाटील यांनी दिली.