धाराशिव (प्रतिनिधी)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 च्या प्रक्रियेस 15 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी आदर्श निवडणूक आचार संहिता लागू केलेली आहे. भारत निवडणूक आयोगास भारतीय राज्यघटनेचे कलम 324 खाली प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन ही निवडणूक विनाअडथळा व शांततेने पार पाडण्यासाठी निवडणूकीच्या काळात राजकीय पक्षांनी,निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे,कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे, इत्यादीकरिता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार व भिंती इत्यादीवर संबंधित मालकाची परवानगीशिवाय व संबंधित परवाना प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यांत आलेल्या शक्तीचा वापर करुन निवडणूकीच्या प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा,इमारत, आवार व भिंत इत्यादीचा संबंधित जागा मालकाचे परवानगीशिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.