कळंब (प्रतिनिधी) तळागाळातील व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे महत्वाचे काम पत्रकारांनी केले पाहिजे. कॉर्पोरेट क्षेत्र झाल्याचा आरोप आपल्या या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर का होतो आहे याचा विचारही करण्याची आवश्यकता आहे असे मत नम्रता वागळे यांनी मांडले. कळंब तालुका पत्रकार संघाच्या “पत्रकारांचा कौतुक सोहळा“ या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. हा सोहळा मोहेकर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदाचे पंचविसावे वर्ष होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. शिवशंकर बाप्पा घोंगडे, स्व.बाळशास्त्री जांभेकर, स्व. शि.म. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले.
प्रश्न सोडवण्यासाठी चे माध्यम होणे आपल्याला जमले पाहिजे. फक्त टीआरपी वाढवण्याची स्पर्धा सध्या सुरू आहे. मी जे करतोय ते बरोबर आहे का असा प्रश्न स्वतःला विचारु शकणारा व्यक्तीच खरा पत्रकार असतो. एखाद्या घटनेतील फक्त बातमीच आपल्यासाठी महत्त्वाची असते त्याचा भावनिक विचार करून किंवा स्वतः भावनिक होऊन चालत नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या मातीतील, ग्रामीण माणसातील बातम्या करण्याचे सौभाग्य तुम्हा ग्रामीण भागातील पत्रकारांना मिळाले आहे, ते भाग्य आम्हा इलेक्ट्रॉनिक मिडिया मध्ये मुंबई - पुणे ला काम करणार्यांना नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पत्रकाराला एखाद्या बातमीतील दोन्ही बाजू मांडन्याचे काम करता आले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाला पुढारी न्यूजच्या असिस्टंट न्यूज एडिटर नम्रता वागळे, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, पत्रकार , कवी रवींद्र केसकर,, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर उपस्थित होते. प्रतिकूल परिस्थितीत काम करणारा व्यक्ती म्हणजे पत्रकार असतो. मराठवाड्यातील नगरिकाना आपण ग्रामीण भागातील आहोत याचा न्यूनगंड असतो. परंतु हेच ग्रामीण भागातील व्यक्ती प्रतिभावान असतात त्यामुळे मागासलेपणाचा न्यूनगंड बाळगू नये, आपल्या बोली भाषेला जातीची नाही तर मातीची नाळ जोडलेली असते. असे मत अभय देशपांडे यांनी मांडले.
नैतिक भीतीची जागा दहशितीने घेतली आहे का याचा विचार करावा लागेल, पत्रकारितेची दुकानदारी करणारे पत्रकारही तयार झालेले आहेत त्यात सुधारणा करावी लागेल, आपल्या लेखनाची नैतिक भीती वाटली पाहिजे असे पत्रकार घडणे आवश्यक आहे. आपला वैरी आपल्यातच आहे, तो वैरी शोधण्यासाठी दर्पण दिन असतो. समाजाचा एक्सरे आपण काढतो, आपला एक्सरे काढण्याची वेळ आलेली आहे. असे मत साहित्यिक रवी केसकर यांनी मांडले.पत्रकार संघाच्या आता पर्यंत च्या कामाचा आढावा अशोक शिंदे यांनी मांडून, वाचन चळवळ वाढवण्यासाठी अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प बोलून दाखवला.
या सोहळ्यामध्ये आफताब शेख, अतुल कुलकर्णी, गणेश शिंदे, निलेश मोहिते, बालाजी अडसूळ, गिरीष जव्हेरी, मुस्तानभाई मिर्झा, अब्दुल माजीद काझी यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
तसेच अश्रुबा कोठावळे यांच्या “बालमानांतील शब्द पेरणी“ कविता संग्रहाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरोग्य शिबीर घेण्यात आले. यामध्ये महाविद्यालयीन विध्यार्थी तसेच कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार व नागरिकांनी याचा लाभ घेतला.
कै.गणेश घोगरे या नावाने दिला जाणारा पुरस्कार बालाजी अडसूळ यांना दिला त्यावेळी ते भावुक झालेले दिसले. कै. गणेश घोगरे आणि बालाजी अडसूळ यांनी एकाच वेळी पत्रकारिता सुरु केली होती. काळाच्या ओघात मित्र गेला, हयात नसलेल्या मित्राच्याच नावाचा पुरस्कार त्यांच्या या मित्राला मिळाला असे भावपूर्ण मत त्यांनी मांडले.
सत्ताधारी खासदाराच्या विरोधात बातमी लावली म्हणून आजकाल एखादे चॅनेल बंद केले जाते हे खेदजनक आहे असे मत पुरस्कार प्राप्त पत्रकार मुश्तान मिर्झा यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले. सूत्र संचालन प्रा. जगदीश गवळी यांनी तर आभार प्रदर्शन सतीश टोणगे यांनी मानले. कार्यक्रमाला कळंब शहरातील नागरिक, पदाधिकारी, तालुक्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.