धाराशिव (प्रतिनिधी)-भारत हे ज्ञानाचे केंद्र बनावे यासाठी नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात आल्याचे मत अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. जीवन पवार यांनी व्यक्त केले.
धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत राज्यात इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कूल कनेक्ट हे संपर्क अभियान राज्य शासन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या आदेशावरून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरण कसे असणार आहे ?याबाबत रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी साधन व्यक्ती म्हणून प्रोफेसर डॉ.जीवन पवार,डॉ. मंगेश भोसले, प्रा.बालाजी कऱ्हाडे हे लाभले होते.
प्रोफेसर डॉ. जीवन पवार पुढे म्हणाले की, यापूर्वी तक्षशिला नालंदा यासारखी विद्यापीठे अस्तित्वात असल्यामुळे विदेशातील लोक ज्ञानग्रहण करण्यासाठी भारतात येत होते. परंतु या विद्यापीठानंतर अशी परिस्थिती भारतात राहिलेली नाही. म्हणून भारताला ज्ञानाचे केंद्र बनवायचे असेल तर नवीन शैक्षणिक धोरण 2020 या धोरणाची गरज असल्याचे ते म्हणाले. सदर कार्यशाळा तीन सत्रा मध्ये पार पडली. सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रेय साखरे यांनी केले तर आभार डॉ.अवधूत नवले यांनी मानले.सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.