धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त जिल्ह्यात महानाट्याचे तसेच पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. संबंधित यंत्रणांनी आयोजनाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात या संदर्भात आज 2 जानेवारी रोजी आयोजन समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे,धाराशिव तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, विद्यापीठ उपकेंद्र कला व नाट्य विभागाच्या प्रमुख प्रा.उषा कांबळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेल्लोरे,साहित्यिक युवराज नळे,केतन पुरी,कलाकार विशाल शिनगाडे व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या सूचनेनुसार या महोत्सवाच्या आयोजनाबाबत उपसमिती स्थापन करून कार्यक्रमस्थळाची चाचपणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. आयोजक असणाऱ्या सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचनाही करण्यात आल्या आहेत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रम यांचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येत आहे.राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ,  लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती आदी बाबी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.   

याअंतर्गत जिल्ह्यातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.लवकरच आयोजना संदर्भातील तारखा निश्चित करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त 2 जून, 2023 ते 6 जून 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे.या कार्यक्रमांना 2 जून 2023 पासून प्रारंभ करण्यात आला आहे.या महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची,चरित्राची,विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकीक वारशाला प्रसिध्दी मिळावी या उद्देशाने विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत.या उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत त्यांचे विचार महानाट्याव्दारे जिल्ह्यांमधील जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महानाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीला शिक्षण,पोलीस, माहिती विभाग,महसूल व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यरत सदस्य उपस्थित होते.


 
Top