धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यामधील उर्वरित पाच तालुकेसहित पीक व पाण्याची परिस्थिती पाहता संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बुधवारी (दि.2) ही मागणी केली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, 31 ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळी जाहीर केले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील घडलेल्या पर्जन्यमानामुळे भूजल पातळी 1.6 मीटरने मागील पाच वर्षाच्या सरासरीने घसरली आहे. जिल्ह्यातील तळ्यामधील जलसाठा 12 टक्के आहे. रब्बी पेरणी गतवर्षीच्या तुलनेत अर्ध्यावरच राहिली आहे. शासनाने धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुके जरी ट्रिगर-2 लागू झाले असले तरी पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. मराठवाड्यात सर्वात जास्त पशुधन असलेला धाराशिव जिल्हा आहे. तथापि जिल्ह्यामध्ये जनावराच्या चायाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामधील उर्वरित पाच तालुकेसहित पीक व पाण्याची परिस्थिती पाहता संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यात यावा अशी मागणी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. संजय पाटील दुधगावकर यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीची दखल घेत त्यांनी हे निवेदन दिले आहे.