धाराशिव (प्रतिऩीधी) :-  उस्मानाबाद जनता सहकारी बँकेत 5 कोटी 46 लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी धाराशिव पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा नोंद केला असुन यांची व्याप्ती पाहून हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. 28 सप्टेंबर 2005 ते 31 मार्च 2008 या काळात हा घोटाळा करण्यात आला असुन तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आरोपी करण्यात आले आहे. घोटाळा लपवण्यासाठी इतर निधी वापरण्यात आल्याचेही अहवालात म्हणटले आहे. गुन्हा नोंद झाल्याची चाहूल लागताच सर्व आरोपी फरार आहेत. आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत असल्याने याची व्याप्ती वाढणार आहे, जनता बँकेच्या तत्कालीन संचालक सोबत ब्रोकर कंपनी व नोयडा टोल ब्रिजचे तत्कालीन मंडळ कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे.

दिवाळखोरीत निघालेली माहिती असताना नोयडा टोल ब्रिज या कंपनीचे डीप डिस्काउंट बॉण्ड खरेदी केले. एका शेअरची रक्कम अलाहाबाद उच्च न्यायालयाने 9 हजार 500 रुपये असतानाही जनता बँकेने ब्रोकरच्या माध्यमातून एक शेअर 23 हजार रुपयाला असे 4 हजार 400 बॉण्ड विकत घेतले. एक बॉण्ड तब्बल 13 हजार 500 रुपयांना अधिकने खरेदी केला त्यात त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप आहे.

बँकेचे सभासद असलेल्या प्रवीण विष्णुपंत धाबेकर यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा नोंद क्रमांक 173/23 नुसार कलम 420, 409, 34 प्रमाणे गुन्हा धाराशिव शहर पोलिस ठण्यात नोंद झाला आहे. गुन्ह्याचा तपास संतोष शेजाळ करीत आहेत.

बँकेत ठेवीदार व सभासद यांनी ठेवलेल्या रकमेतून जनता बँकेने डीप डिस्काउंट बॉण्ड खरेदी करण्याचा निर्णय घेतला. नोयडा टोल ब्रिज कंपनीचे बॉण्ड एसीई ग्लीरस ट्रेडिंग या ब्रोकर कंपनी मार्फत 29 सप्टेंबर 2005 रोजी 1 हजार 300, 5 ऑक्टोबर रोजी 2 हजार 200 व 13 ऑक्टोबर 900 असे 4 हजार 400 बॉण्ड खरेदी केले.

पैसे गुंतवणूक करीत असताना बँकेने नोयडा ब्रिज कंपनीचे मागील 3 वर्षाचे आर्थिक ताळेबंद, नफा तोटा पत्रक व रकमेची सुरक्षितता विचारात घेऊन गुंतवणूक केली नाही. आरबीआयच्या नियमाचे पालन केले नाही.

विशेष म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोयडा ब्रिज कंपनीचे डीप डिस्काउंट बॉण्ड बाबत 8 ऑक्टोबर 2004 रोजी आदेश देत एका बॉण्डची रक्कम 9 हजार 500 रुपये ठरवून दिली होती मात्र जनता बँकेने ब्रोकरच्या माध्यमातून 9 हजार 500 चा एक बॉण्ड 23 हजार रुपयाला असे 4 हजार 400 बॉण्ड खरेदी केले. आरबीआयने याबाबत अनेक वेळा तपासणी अहवालात मुद्दा क्रमांक 4.3 मध्ये ताशेरे ओढले मात्र 3 मार्च 2006 ते डिसेंबर 2007 या काळात म्हणजे 21 महिने अपहारावर गुन्हा नोंद केला नाही किंवा काहीही कारवाई केली नाही. जनता बँक अलाहाबाद कोर्टात गेली होती त्यावर बँकेचा हा कारभार पारदर्शक नसून ठेवीदारांच्या रकमेचा अपहार केल्याचे निरीक्षण नोंदविले.

असा लपवीला घोटाळा, इतर निधी वळवीला -

ताळेबंद पत्रकात अपहरीत रक्कम नमूद केली गेली मात्र इमारत निधी 1 कोटी 81 लाख, अमृत महोत्सव निधी 15 लाख, सेवक कल्याण निधी 1 कोटी 50 लाख, धर्मादाय निधी 25 लाख, घसारा निधी 47 लाख व इतर वळवुन तो भरण्यात आला त्यामुळे ही रक्कम 31 मार्च 2008 नंतर ताळेबंद पत्रकात दिसली नाही.

उस्मानाबाद जनता बँकेने अनेक वेळा नियमबाह्यरित्या काही मर्जितील संचालक, पुढारी कम कर्जदार यांचे कर्जाचे वन टाइम सेटलमेंट केले असल्याच्या तक्रारी आहेत. याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

पिक्चर अभी बाकी है / अनेक घोटाळे उघड करणार - धाबेकर 

ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है अशी प्रतिक्रिया फिर्यादी प्रवीण विष्णुपंत धाबेकर यांनी दिली आहे. जनता बँकेत अनेक घोटाळे असुन ते टप्याटप्याने उघड करणार असल्याचे सांगितले. बँकेच्या अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार बाबत तक्रारी केल्या की संचालक त्या तक्रारदाराचे सभासदत्व रद्द केले जाते मात्र आता यापुढे असे झाले की कोर्टात दाद मागू असे धाबेकर म्हणाले.

या 10 जणांची नावे तक्रारीत नमूद -

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विद्यमान चेअरमन वसंतराव संभाजी नागदे, तत्कालीन चेअरमन विश्वासराव शिंदे, व्हा चेअरमन वैजिनाथराव शिंदे, तत्कालीन संचालक निवृत्तीराव भोसले, पांडुरंग धोंगडे, हरी सूर्यवंशी, साहेबराव पाटील, सुभाष धनुरे, सौ निर्मला लेणेकर, तत्कालीम तज्ज्ञ संचालक सुभाषराव गोविंदपुरकर अश्या 10 जणांची नावे आरोपी म्हणून तक्रारीत नमूद आहेत तर 7 जण मयत झाले आहेत.

 
Top