धाराशिव / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जात असून यास महिलांचा देखील उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. राज्य सरकार याबाबत अतिशय सकारात्मक असून महिलांसाठी विशेष योजना राबवीत आहे. अनेक मुलींना गावात माध्यमिक शाळेची सोय नसल्याने शाळेत जाण्यासाठी काही किलोमीटर पायपीट करावी लागते. त्यामुळे त्यांची होत असलेली गैरसोय दुर करण्यासाठी माध्यमिक शाळेतील मुलींना २००० सायकल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी उमेद अंतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलताना दिली.

 यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर धाराशिव योजने अंतर्गत युवक-युवतींना रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासह चालु व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. अनेक महिलांनी या अंतर्गत प्रस्ताव दाखल केले असून स्वतःचे उद्योग देखील सुरू केले आहेत. उमेद गटातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा व अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध योजनांची माहिती महिलांना व्हावी यासाठी योजनांची माहिती पुस्तीका तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले.

 अनेक गावे, तांडे, वस्तीवर माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षणासाठी परगावी चालत जावे लागते. त्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी जिल्ह्यातील माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या गरीब कुटुंबातील मुलींना सी.एस.आर च्या माध्यमातून २००० सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे मुलींचे शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी होण्यास देखिल मदत होणार आहे.

 यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ताभाऊ कुलकर्णी, अँड.कल्पना निपाणीकर, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ. बलवीर मुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक श्रीमती प्रांजल शिंदे यांच्यासह बहु संख्येने महिला उपस्थित होते.


 
Top