उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्यात व देशात असलेले सरकार पत्रकारांनी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर त्या बातमीचे सोर्स काय आहेत ? हे सांगण्यास भाग पाडणारा कायदा आणणार आहे. आजपर्यंत महाराष्ट्र किंवा देशाच्या इतिहासात सोर्स सांगण्याची गरज नव्हती. हे एक प्रकारे पत्रकारांवर बंधन असून हे मोठे बॅनर असलेल्या वृत्तपत्रांनी मान्य करु अथवा न करु. मात्र लोकशाहीचा आवाज जिवंत ठेवण्यासाठी व्हाईस ऑफ इंडिया बरोबरच व्हाईस आॕफ डेमोक्रॅसी पण करण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट  प्रतिपादन आ. कैलास पाटील यांनी केले पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन  दि.२६ जानेवारी रोजी आ.पाटील यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते


उस्मानाबाद येथील आर्यन फंक्शन हॉलमध्ये व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने पत्रकार दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त पत्रकारांसाठी  कार्यशाळेचे .आयोजन करण्यात आले होते  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, व्हाईस ऑफ मीडियाचे राज्यध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने, भाजपाचे  दत्ता कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस चे डॉ प्रतापसिंह पाटील,  संजय पाटील दुधगावकर,विवेक घोगरे, पञकार संतोष जाधव,व्हाईस आॕफ मेडियाचे बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख, तालुकाध्यक्ष अमजद सय्यद आदी उपस्थित होते.  पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की, पत्रकारांना लिखाणाचे स्वातंत्र्य  असले  पाहिजे  कारण पत्रकारांना काय योग्य अयोग्य हे चांगल्या प्रकारे समजते. तर ग्रामीण भागातील पत्रकारांना जे दिसते ते छापतात व डिजिटल मीडीयाच्या माध्यमातून दाखवितात. तसेच लोकशाहीचा आवाज जिवंत करण्यासाठी वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी व त्यांच्या मुलभूत गरजांना मदत करणे गरजेचे आहे.  विशेष म्हणजे आपल्या देशाची लोकशाही वाचविण्यासाठी आपण लोकशाहीचा आवाज होणे गरजेचे आहे. तर व्हाईस ऑफ मीडियाच्या मागे सर्व ज्येष्ठ व तरुणांची टीम असल्यामुळे ती महाराष्ट्राचा आवाज म्हणून महाराष्ट्रभर ओळखली जाईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच पत्रकारांसाठी गृहनिर्माण योजना, मेडीक्लेम किंवा इतर कोणत्याही योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न तर करण्यासह आरोग्य वीमा पॉलिसीसाठी मी कायम आपल्या सोबत असेन असे आश्वासनही त्यांनी दिले. दत्ता कुलकर्णी यांनी पत्रकारांची पत्रकारिता समाजाभिमुख झाली असून ती देखील जागृत झालेली आहे‌. पत्रकारांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी विशिष्ट पातळीपर्यंत मदत करू अशी आश्वासन त्यांनी दिले. तसेच डॉ प्रतापसिंह पाटील   संजय पाटील दुधगावकर यांचेही भाषण झाले प्रास्ताविक हुंकार बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन रविंद्र पेठे यांनी व आभार रहीम शेख यांनी मानले.

सकारात्मक पत्रकारितेसाठी अडीच लाख रुपयांचे पुरस्कार

 राज्याध्यक्ष राजा माने म्हणाले की, महाराष्ट्रात नव्हे तर देशात सकारात्मक पत्रकारिता असावी यासाठी ही संघटना निर्माण झाली आहे. पत्रकारितेला नवे वळण देण्याची मला संधी मिळाली असून यावर्षीपासून महाराष्ट्रातील सर्वच माध्यमांतील सकारात्मक पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना अडीच लाख रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार असल्याची ऐतिहासिक घोषणा  केली. तर आजची पत्रकारिता सोपी राहिलेली नाही, हे खरे असले तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल असणे म्हणजे तो पत्रकार आहे असे नव्हे असे सांगत पुढच्या काळातील पत्रकारिता जबाबदारीची असणार असल्याचे त्यांनी नमूद केले.   पत्रकारांना दिशा देण्यासाठी ही संघटना असून देशातील २३ राज्यांमध्ये या संघटनेचे जाळे पसरलेले आहे. 

 मक्तेदारी मोडून काढा

संस्थापक अध्यक्ष संदीप काळे म्हणाले की, पत्रकारांनी धाडस घेऊन जो पुढे येतो तो स्वतःचा नव्हे तर समाजाचा हिरो होतो असे सांगत पत्रकारिता क्षेत्रातील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी हुंकारने हुंकार दिला आहे. या क्षेत्रातील मक्तेदारी मोडून काढून नवीन काहीतरी निर्माण करायचे आहे असून हा ऐतिहासिक कार्यक्रम असल्याचे सांगितले. तसेच नियम, स्थलांतर व सातत्य व्हावे यासाठी ही संघटना पुढे आली असून ग्रामीण भागातील सगळ्यात महत्त्वाचा कणा असणारा पत्रकार दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सगळी मंडळी पुढे आली पाहिजे असे सांगत खऱ्या अर्थाने लोकशाहीला जिवंत  ठेवण्याचे काम पत्रकार व पत्रकारिता करीत असल्याचे त्यांनी सांगितले.   चांगले काम करा, कोणी कितीही विरोध करु द्या, उत्तम आणि सामाजिक प्रवाहासाठी झोकून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

विशेष सत्कार

यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, एस.ए. सय्यद, कमलाकर कुलकर्णी, अंबादास पोफळे, दिलीप पाठक-नारीकर, दिपक लोंढे, प्रशांत कावले, शीला उंबरे, अंबादास दानवे, इस्माईल सय्यद, भारतीय डाक विभागाचे व्यवस्थापक चंद्रकांत झेंडे, हुंकार बनसोडे यांचा तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल देविदास पाठक यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच अमर चोंदे, वैभव पारवे, चेतन कात्रे, किशोर माळी व तानाजी घोडके यांना व्हाईस ऑफ मीडियाचे प्रतिनिधीक स्वरुपात ओळखपत्र तर कै.अनिल केसकर सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने पत्रकारांसाठी काढण्यात आलेल्या विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले.

 
Top