उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 संपूर्ण महाराष्ट्रात गोगलगाय, अतिवृष्टी, सततचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र हे गद्दार सरकार गद्दार मंत्री व गद्दार आमदार पाहणी करून शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा देण्यासाठी साधे फिरकले देखील नाहीत. या गद्दारांना धडा शिकवून जनतेच्या आशीर्वादावरच पुन्हा नवा महाराष्ट्र घडवायचा आहे असा आत्मविश्वास युवा शिवसेना प्रमुख तथा आमदार आदित्यजी ठाकरे यांनी भूम तालुक्यातील ईट येथील जाहीर सभेत शेतकरी व जनतेशी संवाद साधताना दि. ८ नोव्हेंबर रोजी दिला.

 युवा शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधित त्यांना धीर दिला. भूम तालुक्यातील ईट येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शामलताई वडणे यांच्यासह धाराशिव तालुका प्रमुख सतिशकुमार सोमाणी, कळंब तालुका प्रमुख शिवाजी (आप्पा) कापसे, भुम तालुकाप्रमुख श्रीनिवास जाधवर, परंडा तालुका प्रमुख मेघराज पाटील, वाशी तालुकाप्रमुख विकास मोळवणे, उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, दिपक जवळगे, बसवराज वरनाळे, सुधाकर पाटील, दिलीप शाळु महाराज, आदी उपस्थित होते.

 पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, आघाडी सरकारच्या माध्यमातून आघाडी सरकारने ६५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणून उद्योग उभारले. मात्र गद्दार सरकारच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातला स्थलांतरित झाले. त्यामुळे लाखो तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला असता. मात्र यासाठी खोके सरकार व या गद्दारांचे प्रमुख एकनाथ शिंदे हे काहीही करू शकले नाहीत. स्वतःच्या फायद्यासाठी ते आजपर्यंत १५ वेळा दिल्लीला जाऊन आले. मात्र हे उद्योग महाराष्ट्रात उभा करण्यासाठी त्यांनी काहीही प्रयत्न केले नसल्याचा गंभीर आरोप केला. तसेच जनतेने तुम्हाला निवडून दिले असून त्यांची सेवा करा असे म्हणत शेतकरी, तरुण व उपस्थित महिलांना त्यांनी सर्व ओके आहे का ? असे म्हणत या खोके सरकारची खोकेगिरी चव्हाट्यावर आणली. मी संपूर्ण राज्याचा पाहणी दौरा करीत असून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेले असून शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे आम्ही या सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. परंतू सरकारने गांभीर्याने घेतले नसून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अशी भयानक व विदारक परिस्थिती असताना देखील काही शेतकऱ्यांचे पंचनामे केले नाहीत तर ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत मदत देण्याची घोषणा केली. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झाला नसल्याचे सांगत हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमदार कैलास पाटील यांनी उपोषण केल्यानंतर सरकारने आश्वासन दिले मात्र आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी सरकारने अद्यापपर्यंत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली नाही.

 ३ महिन्यात सरकार कोसळणारच

  आम्ही लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी आम्ही आघाडी करुन सरकार स्थापन केले होते. मात्र विश्वासघात व गद्दारी करुन सत्तेवर आलेले असंवैधानिक खोके सरकार कोणत्याही परिस्थितीत येत्या ३ महिन्यात कोसळणार असल्याचा ठाम दावा त्यांनी केला.


 
Top