उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विमा अनुदान, नुकसानभरपाईसाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरु केलं आहे. आज उपोषणाचा त्यांचा तिसृरा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून काही महिलांनी उपोषणस्थळी कैलास पाटील यांचं औक्षण करुन भाऊबीज साजरी केली.

 उस्मानाबाद जिल्ह्यात सतत होणारी अतिवृष्टी त्यामुळे होणारे पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी अडचणीत आला असून त्यांचा हक्काचा पीक विमा आणि नुकसान भरपाई त्वरीत द्यावी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०२० मधील पिकविम्याची ५३१ कोटी रुपये जिल्हयातील ३ लाख ५७ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ३ आठवडयात जमा करण्याचे बंधनकारक असताना देखील अदयाप पर्यंत पीकविमा जमा झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील हा पीक विमा जमा होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न उपस्थित करत कैलास पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

 २०२१ मधील ५० टक्के पीक विमा भरपाई रक्कम तसेच सप्टेंबर २०२२ मध्ये झालेली अतिवृष्टी व विविध रोगामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई व पीक विमा रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, या मागणीसाठी आमदार कैलास पाटील यांनी आमरण उपोषण चालू केल आहे.

 सन २०२० खरीप हंगामातील उर्वरित ३३१ कोटी रुपयांची कंपनीकडे मागणी करावी, असं प्रशासनाच्या शिष्टमंडळाला कैलास पाटील यांनी सुनावले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज तिसऱ्या दिवशी प्रशासनाच्या शिष्टमंडळ भेट दिली. प्रशासनानं कैलास पाटील यांना उपोषण थांबविण्याबाबत विनंती केली. परंतु आपण आपल्या मागण्यावर ठाम आहोत. सन २०२० च्या खरीप हंगामातील ५३१ कोटी रुपये इतका विमा मिळण्यासंदर्भात ठोस कृती झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे यापूर्वीही स्पष्ट केले होते आणि आजही शिष्टमंडळाला त्याच प्रखरतेने मागणी मांडली. २०१ कोटी रुपये प्रशासनाकडे आले आहेत, उर्वरित ३३१ कोटी रुपयांची कंपनीकडे मागणी केली आहे का अशी विचारणा केली असता, मागणी न केल्याचे प्रशासनानं कैलास पाटील यांना सांगितले. यावेळी कंपनीकडे लेखी स्वरूपात मागणी करावी व तातडीने ती मिळवून घ्यावी, असे स्पष्ट कैलास पाटील यांनी शिष्टमंडळाला सुनावले. शिवाय २०२० मध्ये विमा योजनेत समाविष्ट २९५२३७.८५ हेक्टर क्षेत्र असलेल्या ३,५७,२८७ शेतकऱ्यांची संपूर्ण गाव निहाय यादी तयार करून ग्रामपंचायत कार्यालयात लावावी आणि त्यातील त्रुटींची माहिती संकलित करावी, अशी मागणी शिष्टमंडळाकडे केली.

 
Top