उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यात बूथ तेथे उद्योग, व्यवसाय उपक्रम राबविण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला होता. ‘आत्मनिर्भर युवक, आत्मनिर्भर उस्मानाबाद’ उपक्रमाला उत्तम प्रतिसाद व मोठे यश मिळत असून, आजवर १४१ नवउद्योजकांचे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राच्या मान्यतेसह बँकेकडे दाखल झाले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून व भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भूमकर यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये उद्योग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व उद्योगासंदर्भात युवकांना मार्गदर्शन करण्यात आले होते. या योजनेंतर्गत स्वगुंतवणूक केवळ ५ टक्के ते १० टक्के असून, १५ टक्के ते ३५ टक्केपर्यंत अनुदान मिळते. ५० लाखापर्यंतचे प्रकल्प या योजने अंतर्गत सुरु करता येत असून, त्यासाठी किमान शैक्षणिक अहर्ता ८ वी पास अशी आहे. रुपये १० लाखापर्यंत विनातारण कर्जाची सोय या योजने अंतर्गत आहे. यामध्ये लहान मोठे १५० पेक्षा जास्त उद्योग अंतर्भूत आहेत. राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असून यामध्ये अर्ज केलेले डाळ उद्योग, लाकडी तेल घाणा, सुगंधीत तेल उत्पादन, अगरबत्ती उत्पादन, ब्युटी पार्लर, केश कर्तनालय, फॅब्रिकेशन, मत्स्यपालन, दुग्ध प्रक्रिया उद्योग, खवा उद्योग अशा व इतर उद्योगांची नोंदणी झाली आहे.
युवकांनी सहभाग नाेंदवावा
आजवर ४६० पेक्षा जास्त प्रस्तावांची नोंद प्राप्त झाली असून २४० प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रात दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यापैकी १४१ प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रातून मंजुर करुन बँकेकडे पाठविण्यात आले आहेत व त्याचा पाठपुरावा चालु आहे. आवडीचा उद्योग, व्यवसाय सुरू करुन आपला युवक आत्मनिर्भर व्हावा व याच माध्यमातून आपला जिल्हा आत्मनिर्भर व्हावा, असा मानस व्यक्त करत योजनेचे यश पाहून जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.