उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा व पर्यटन स्थळांचा विकास करून येथील अर्थकारणाला मोठी चालना मिळू शकते. केंद्र सरकारचे यासाठी सर्वतोपरी सहकार्य असून स्वदेश दर्शन व प्रशाद योजनेच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात मोठया प्रमाणात गुंतवणुक वाढवुन या भागाचा विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांनी काजळा (ता. उस्मानाबाद ) येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी केले.

तेर येथे रु.२० कोटी खर्च करुन पुराणवस्तु संग्रहालयाचे नुतनी करण करण्यात येत आहे. या ‍ठिकाणी केवळ राज्यातील व देशातीलच पर्यटक नव्हे तर जगभरातील पर्यटक भेट देण्यासाठी येणार आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी, संत श्रेष्ठ श्री गोरोबाकाका मंदीर तेर, जैन धर्मांचे पवित्र देवस्थान कुंथलगीरी, उस्मानाबाद येथील खॉजा शमशोद्दीन गाजी (रहे) दर्गाह, परंडा येथील भुईकोट किल्ला, नळदुर्ग येथील ऐतिहासीक किल्ला, अचलबेट देवस्थान या सारखी अनेक ऐतिसाहीक व धार्मीक स्थळे आहेत. या स्थळांचा विकास केल्यास मोठया प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढेल व या माध्यमातुन रोजगार ‍निर्मीती होऊन येथील अर्थकारणाला मोठी चालना मिळेल. ज्या प्रमाणे शेती व औद्योगीकी करणातुन रोजगार ‍निर्मीती होते त्याच प्रमाणे पर्यटन स्थळांच्या माध्यमातुन मोठया रोजगार निर्मीती सह या भागात  गुंतवणुक वाढून आर्थिक समृद्धी येईल. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था केवळ पर्यटनावर अवलंबुन आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या विकासासाठी आपण पर्यत्नशील असल्याचे ते यावेळी म्हणाले.

 काजळा (ता. उस्मानाबाद ) येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ ग्रामस्थानिकांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात प्रामुख्याने स्वामी रामानंद महाराज मठ येथे तीर्थक्षेत्र विकास निधीतून भक्त निवास बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, गाव अंतर्गत सिमेंट, गावांतर्गत बंदिस्त नाली बांधकाम आदी विकास कामांचा समावेश आहे.

 गावातील युवकांनी छोटे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले. कृषी मालावरती आधारित प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी मोठा वाव आहे. उद्योग उभारणीसाठी सरकार सहकार्य करायला तयार आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत, परंतु याची आपल्याला माहिती नसते. गावातील होतकरू तरुणांनी पुढे येवून या योजनांचा अभ्यास करावा व आपल्याला सोयीस्कर असलेला एखादा उद्योग उभारणीसाठी प्रस्ताव तयार करावा. यासाठी आवश्यक कर्ज मंजुरीचा प्रस्ताव संबंधित बँकेकडे पाठवावा, आपण त्यांना सहकार्य करण्यास सांगू असे हि त्यांनी यावेळी सांगितले.  

 रामानंद महाराज तीर्थक्षेत्रास ‘ब’ दर्जा मिळवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निकष पूर्ण करून प्रस्ताव सादर करावा, आपण यासाठी प्रयत्नशील राहू असे आ.पाटील यांनी गावकऱ्यांना आश्वासित केले. आदरणीय डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांचे काजळा गावाशी जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते आहे, हे नाते विकास कामांच्या माध्यमातून सदैव असेच कायम ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

 यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे, जि.प.बांधकाम सभापती श्री.दत्ता देवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भाजपा तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, जि.प.सदस्य श्री.अभिमन्यु शितोळे, पं.स.सदस्य प्रदीप शिंदे, विष्णुदास आहेर, सरपंच प्रवीण पाटील, उपसरपंच नाना मडके, देवस्थान कमेटी अध्यक्ष प्रदीप शेळके, ओम मगर, विजय हाऊळ, विलास खोचरे, चंदूनाना पवार, रामचंद्र कदम, बप्पा पवार, विनोद बाकले, अमर बाकले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top