उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार खात्यासाठी केंद्रीय स्तरावर नवीन मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा केली असून, या निर्णयाचे स्वागत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले आहे.

“सहकार से समृद्धी’ हा मूलमंत्र घेऊन हे खाते देशातील सहकार चळवळीला संजीवनी देण्याचे काम करेल. देशपातळीवर सहकार विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे, अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासमवेत सहकार परिषदेचे सदस्य दत्ता कुलकर्णी यांनी वेळोवेळी केली होती व सातत्याने त्याचा पाठपुरावा देखील केला होता. पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्य आणि देशातील कार्यकर्त्यांच्या मागणीला यश आले आहे.या मंत्रालयामुळे राज्यातील व देशातील सहकार चळवळ अधिक समृद्ध होईल.

हा निर्णय “आत्मनिर्भर भारत’ योजनेच्या यशस्वीतेसाठी व सहकार चळवळीला लोकल ते ग्लोबल ओळख मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. देशातील सहकार चळवळीची व्याप्ती पाहता याचे भावी काळात परिणाम दिसू शकतात. पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयाचे व देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शहा यांचे कुलकर्णी यांनी अभिनंदन केले असून, आभारही मानले आहेत.

 
Top