उस्मानाबाद/ प्रतिनिधी

आजपर्यंत कोरोनावर अद्यापही रामबाण औषध निघालेले नाही. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक लस हीच कोरोना थोपविण्यासाठी एकमेव प्रभावी माध्यम आहे. त्यात ही “लस” प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न चालू असून, त्याचाच एक भाग म्हणून स्वाधार मतीमंद मुलींचे वसतीगृह आळणी व वरुडा येथील पारधी वस्ती येथे विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. मागील तीन चार महिन्यापासून लसीकरणासाठी संस्थात्मक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यात बहुतांशी यशही मिळत आहे. पण आजही गावातील काही घटक, तांडे, वस्त्या, निराधारांचे समुह, दिव्यांग, स्थलांतरीत समुह इत्यादी या प्रवाहापासून दुर असल्याचे दिसुन येते. त्यामुळे अशा घटकांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या लसीकरण सत्रास भेट देवून लसीकरण मिळणे हा सर्वांचा मुलभूत अधिकार असल्याने त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आवाहन  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले.

स्वाधार मतीमंद मुलींचे वस्तीगृह येथे जावून १८ वर्षावरील मुलींचे लसीकरण करण्यात आले. तर वरुडा पारधी वस्ती वरील लोकांचे तिथेच लसीकरण करुन लोकांना संरक्षित करण्यात आले. या दोन्ही सत्रासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी, ढोकी यांच्या पथकामार्फत लसीकरण करण्यात आले. मा.जिल्हाधिकारी यांचे समवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.के.के.मिटकरी, तहसीलदार श्रीमाळी, वैद्यकिय अधिकारी डॉ.बावणे, डॉ.क्षिरसागर, सामुदायीक आरोग्य अधिकारी डॉ.बिरादार व इतर कर्मचारी हजर होते.


 
Top