जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन, कारवाईची केली मागणी

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तेर ता. उस्मानाबाद येथील दैनिक सामनाचे पत्रकार विजय विष्णू कानडे यांना ढोकी पोलीस ठाण्याचे एपीआय सुरेश बनसोडे यांनी पोलिसांना खंडणी मागितली म्हणून खोटा गुन्हा दाखल करून उलटा टांगून मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 17 एप्रिल रोजीच्या दैनिक एकमत मध्ये तेर गावातील अवैध धंद्याबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेऊन ढोकी ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश बनसोडे यांनी तेर गावात धाब्यावर रेड टाकून कारवाई केली होती. रेडची माहिती समजताच पत्रकार विजय कानडे तेर चौकीमध्ये गेले असता श्री, बनसोडे यांनी तुम्हा पत्रकारांना पोलिसांचे चांगले काम दिसत नाही. पोलीस ठाण्याला स्वखर्चाने रंगरंगोटी केली. विरोधात बातम्या छापता, तुझ्यावर पोलिसांना खंडणी मागितली म्हणून खोटा गुन्हा दाखल करून उलट टांगून मारतो, अशी धमकी दिली. 

निवेदनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, राकेश कुलकर्णी, सुभाष कदम, विजय कानडे, विकास भोरे, दत्ता शिंदे, संतोष जोशी, रियाज शेख, मच्छिंद्र कदम, सुभाष कुलकर्णी, सुमेध वाघमारे, बाबुराव चव्हाण, संतोष शेटे, तुषार चव्हाण, बालाजी साळुंके, प्रमोद राऊत, विपीन वीर, देविदास पाठक, राजा वैद्य, मलिकार्जुन सोनवणे आदींच्या सह्या आहेत.

 
Top