तेर / प्रतिनिधी -
उस्मानाबाद जिल्हा हा अवर्षण प्रवण क्षेत्रात येणारा जिल्हा आहे .या जिल्ह्यातील पडणाऱ्या पावसाच्या लहरीपणामुळे कधी खूप जास्त तर ,कधी कमी पावसाचा खूप मोठा खंड पडतो. यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट येते .हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी केले.
 वानेवाडी ता. उस्मानाबाद येथील महिला शेतकऱ्यांसाठी आयोजित महिला शेती शाळेच्या खरीप पूर्व हंगाम प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना ज्ञानेश्वर जाधव म्हणाले की, रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी केल्यामुळे एकरी 20 ते 22 किलो बियाणे पुरेसे होते. त्यामुळे बियाण्याची बचत होते. रुंद वरंबा सरी पद्धतीने जास्त पावसामुळे शेतातील पाणी सरी द्वारे बाहेर काढले जाते तर कमी पाऊस झाल्यास हे पाणी सरीमध्ये मुरल्यामुळे मूलस्थानी जलसंधारण होण्यास मदत होते. जमिनीत पाणी भरण्याचे प्रमाण वाढते .जमिनीत ओलावा टिकून राहतो .त्यामुळे पावसाचा खंड पडलेल्या काळात सोयाबीन पीक वाचवण्यास फायदा होतो. या पद्धतीमुळे पिकास सूर्यप्रकाश व हवा पुरेशा प्रमाणात मिळत असल्यामुळे हेक्‍टरी 20 ते 25 टक्के उत्पादनात वाढ होते. यावेळी मंडळ कृषी अधिकारी सत्यजित देशमुख ,कृषी सहाय्यक वैभव लेणेकर, कृषी मित्र शिवराज घेवारे, कृषी सखी मीरा जाधव, पोलीस पाटील मनीषा घेवारे ,सरपंच प्रतिभा सरवदे यांच्यासह महिला शेतकरी उपस्थित होत्या.

 
Top