महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

धाराशिव /प्रतिनिधी 

   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आता उमरगा-लोहारा मतदारसंघात अधिक प्रभावीपणे राबविली जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघनिहाय समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी विशेष समिती गठीत केली असून, धाराशिव जिल्ह्याचे युवा नेते शरण बसवराज पाटील यांची उमरगा–लोहारा मतदारसंघासाठी सह-अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

शरण पाटील यांनी यापूर्वीही मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या व्यथा ओळखून ‘शरण पाटील फाउंडेशन’च्या माध्यमातून स्वतःच्या खर्चातून पाणंद रस्त्यांचे मोठे जाळे उभे केले आहे. पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी होणारी शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर करून त्यांनी महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या या लोकहिताच्या कार्याची आणि प्रदीर्घ अनुभवाची दखल घेत, तसेच उमरगा–लोहारा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांचा यशस्वी पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्याच्या उद्देशाने त्यांची या सह-अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामासाठी आणि शेतमाल बाजारपेठेपर्यंत विनासायास नेण्यासाठी हे पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या समितीच्या माध्यमातून आता शासकीय स्तरावर अधिक गतिमान आणि प्रभावी काम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. उमरगा–लोहारा मतदारसंघस्तरीय समितीत शरण पाटील यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून पुढील सामाजिक कार्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 
Top