धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या तसेच पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांचा सन्मानपूर्वक सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी निवडून आलेल्या उमेदवारांनी जनतेने दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरत शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहावे, पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करावा तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत सर्वसमावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. असेही आवाहन करण्यात आले.
निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी खचून न जाता आपले सामाजिक कार्य, जनतेशी असलेले नाते आणि लोकहिताचे उपक्रम अधिक जोमाने सुरूच ठेवावेत, असा सकारात्मक संदेश देण्यात आला. निवडणूक हा राजकीय प्रवासातील केवळ एक टप्पा असून जनसेवा ही अखंड चालणारी साधना आहे. त्यामुळे विजयपराजयाच्या पलीकडे जाऊन समाजहितासाठी सतत कार्यरत राहणे हीच खरी लोकशाहीची भावना असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. विजयपराजयाच्या पलीकडे जाऊन सर्व उमेदवारांनी लोकशाही प्रक्रियेत दिलेले योगदान मोलाचे असून तुळजापूरच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे, समन्वयाने व सकारात्मक भूमिकेतून काम करणे ही काळाची गरज आहे.
या कार्यक्रमास काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. धीरज भैय्या पाटील, ऋषिकेश मगर, शाम पवार, शामलताई वडणे, अर्जुन आप्पा साळुंके, सागर इंगळे, सुधीर कदम, राहुल खपले तसेच पक्षाचे इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
