भूम (प्रतिनिधी)- भूम शहरात नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या अमृत योजना-02 पाईपलाईन व नगरोत्थान योजनेतील सिमेंट रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करत जनशक्ती नगर विकास आघाडी, भूम यांच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद भूम यांना निवेदन देण्यात आले आहे. या कामांची तात्काळ दखल घेऊन सर्व कामे बंद करावीत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमृत योजना-02 अंतर्गत पाईपलाईनची कामे सुरू असताना अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांचे पालन केले जात नाही. या कामांना नागरिकांचा विरोध असतानाही कामे सुरूच ठेवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे अमृत योजनेची कामे अपूर्ण असताना नगरोत्थान अंतर्गत सिमेंट रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. हे अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
कामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत रस्ते खोदून योग्य पद्धतीने व दर्जेदार भराव न करता, केवळ डांबर टाकून रस्ता तयार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ही कामे भविष्यात निकृष्ट ठरून नागरिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाची मुख्याधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन तत्काळ सर्व कामे थांबवावीत, तसेच संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करून गुणवत्तापूर्ण व पारदर्शक कामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जनशक्ती नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली आहे.
यात आबासाहेब धोंडीराम मस्कर,चंद्रमणी गोरख गायकवाड, अनिल नामदेव शेंडगे,रुपेश परमेश्वर शेंडगे, रामराजे बाळासाहेब कुंभार, नवनाथ विलास रोकडे, विठ्ठल महादेव बागडे, सुनीता गणेश वीर, लक्ष्मी प्रशांत साठे,नुरजहाँ महंमद इसाक माणियार, सुरेखा दत्ता काळे,शमशाद हारून मुजावर, शीतल अमोल गाडे,चंद्रकला हरीशचंद्र पवार निवेदनावर जनशक्ती नगर विकास आघाडीच्या नगर सेवकाच्या सह्या आहेत पदाधिकारी व नागरिकांच्या सह्या आहेत.
