धाराशिव  (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक,संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे 31 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक असून,या ठेवींचा परतावा मिळवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेचा लाभ घेण्यासाठी एकूण 1 लक्ष 43 हजार 969 खातेदारांना आवाहन करण्यात आले आहे.

ही मोहीम 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्हा अग्रणी बँक  भारतीय स्टेट बँक यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे,अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास यांनी दिली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार,सलग 10 वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी ‌‘ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी मध्ये हस्तांतरित केल्या जातात.तथापि,अशा ठेवींचे खातेदार आपल्या ठेवी परत मिळविण्याचा पूर्ण कायदेशीर हक्क राखून असतात.ठेवींचा परतावा मिळवण्यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँक शाखेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे आणि अद्ययावत केवायसी सादर करणे गरजेचे आहे. या विशेष मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे,ग्राहक भेटी आणि माहितीपर कार्यक्रम आयोजित केले जाणार असून,खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक  चिन्मय दास यांनी केले आहे.

 
Top