धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक ध्येय-धोरणांना मूर्त रूप देण्यासाठी जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेली धाराशिव जिल्हा कृती कार्यक्रम बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांची एकजूट, पक्षसंघटन बळकट करण्यावर भर देण्यात आल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी दिली.
या बैठकीदरम्यान आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या पक्षाच्या विविध अभियानांची माहिती देण्यात आली. त्यात 100 जनता दरबाराबरोबरच उद्योग, व्यावसायिक निर्माण करणे, बूथ सक्षमीकरण, युवा संलग्नता, सामाजिक संवाद, संपर्क से समर्थन, मतदार पोहोच अभियान यांसारख्या उपक्रमांवर भर देण्यात आला. प्रत्येक तालुका, मंडळ आणि बूथ स्तरावर पक्षसंघटना अधिक प्रभावी करण्याच्या रणनीतींवर सखोल चर्चा करण्यात आली. या प्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि माजी आमदार बसवराज पाटील आणि जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी भाजपचा विचार समाजाभिमुख आहे. हे तत्व कार्यकर्त्यांच्या वर्तनात आणि कामात दिसले पाहिजे. जनतेच्या मनात पक्षाबद्दल विश्वास निर्माण होणे हे संघटनेचे अंतिम ध्येय असायला अशा पद्धतीचे मार्गदर्शन केले. या बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, ज्येष्ठ नेते नितीन काळे, सर्व मंडळाध्यक्ष, पदाधिकारी, आणि जिल्ह्यातील विविध कार्यक्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी विभागनिहाय आपले अनुभव, अडचणी आणि आगामी रणनीती यावर मते मांडली. बैठकीचा मुख्य उद्देश कार्यपद्धतीत शिस्त, संवादात पारदर्शकता आणि कृतीत एकात्मता या त्रिसूत्रीवर पक्षसंघटनेची उभारणी करण्याचा होता, ज्याचे प्रत्यंतर उपस्थितांच्या सहभागातून दिसून आले.