धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ राज्य निवृत्तिवेतन योजनेचा लाभ अडथळ्याविना मिळावा, यासाठी आमदार व 'मित्र' चे उपाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी पुढाकार घेत “शासन आपल्या दारी“ या संकल्पनेअंतर्गत घरपोच ई-केवायसी मोहीम राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
ही कारवाई 15 जून 2025 रोजी कळंब, धाराशिव व तुळजापूर तालुक्यात घेण्यात आलेल्या ‘भाजपा संकल्प से सिद्धी' अभियानातील सहा जनता दरबारांमध्ये आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. या दरबारांमध्ये सुमारे 2000 तक्रारी नोंदवण्यात आल्या असून, त्यापैकी बहुतांश तक्रारी संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील मानधन थांबण्याबाबत होत्या. या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत आमदार श्री. पाटील यांनी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीबाबत तात्काळ माहिती घेतली व प्रशासनास योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश दिले.
सामाजिक न्याय विभागाच्या या योजनांचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अडचणीत असलेल्या आणि सामाजिक आधारापासून वंचित घटकांना मदत करणे हा आहे. या योजनांतर्गत निराधार पुरुष आणि महिला, अपंग, गंभीर आजारांनी त्रस्त नागरिक, अनाथ, विधवा तसेच 65 वर्षांवरील वृद्ध नागरिकांना दरमहा ठराविक रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते.
जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे 41,230 लाभार्थी आहेत, त्यापैकी 8,097 लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. तसेच श्रावणबाळ योजनेचे 51,604 लाभार्थी असून त्यात 1,240 लाभार्थी ई-केवायसी न झाल्यामुळे वंचित आहेत. ई-केवायसी न झाल्यास लाभार्थ्यांचे मानधन थांबते, यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक झाले आहे.
ही गंभीर बाब लक्षात घेता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून, या विषयावर तातडीने कृती करण्यास सांगितले. त्यानंतर, ग्रामीण भगत ग्रामसेवक, तलाठी तसेच शहरी भागासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी व स्थानिक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ई-केवायसी प्रक्रिया घरोघरी जाऊन पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले गेले. या उपक्रमात भाजपचे स्थानिक कार्यकर्ते गावपातळीवर सहकार्य करणार असून, गरजू लाभार्थ्यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधण्याचे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे. या मोहीमेमुळे जिल्ह्यातील हजारो गरजू लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, “प्रशासन आणि जनप्रतिनिधी यांच्या समन्वयातून गरजूंना दिलासा देण्याचे कार्य हेच खरे लोकाभिमुख शासन आहे,“ असे प्रतिपादन आमदार पाटील यांनी यावेळी केले.