धाराशिव (प्रतिनिधी)- म्हाडाची घरकूल योजना राबविण्यासाठी गेल्या एक वर्षापासून अधिकारी वर्ग धाराशिव जिल्ह्यात जमिनीसाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांना मात्र जमिनी मिळत नाही. तर वाढीव औद्योगिक वसाहतीसाठी शहराजवळील वडगाव सिध्देश्वर येथील 82 शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण केली. परंतु त्यापैकी 27 शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून जमिनीचा मावेजा मिळालेला नाही. त्यामुळे एकीकडे जमिनी असताना काही उद्योग उभारले गेले नाहीत. तर दुसरीकडे जमिनी नाही म्हणून म्हाडाची घरकूल योजना राबविली जात नाही. 

याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील वडगाव सिध्देश्वर येथील एमआयडीसाठी संपादित 57 हेक्टर जमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना मिळाला नाही. एमआयडीसीत जमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक होत एमआयडीसीच्या बोर्डाव्र चढून आंदोलन केले. योवळी मोहन पाटील या शेतकऱ्यांने विष प्राशन केले. शेतकऱ्याची प्रकृती बिघडल्याने त्याला शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल केले. वडगाव सिध्देश्वर येथे एमआयडीसीने 2012 मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. मात्र मावेजा काही शेतकऱ्यांनाच मिळाला. अजूनही 27 शेतकरी मावेजाच्या प्रतिक्षेत आहेत. 


म्हाडा घरकूलसाठी जमीन नाही

म्हाडा घरकूल योजना महाराष्ट्रासह मराठवाड्यात सर्वत्र राबविली जात आहे. मराठवाड्यात सर्वत्र म्हाडा घरकूल योजनेसाठी सरकारी जमिनी मिळाल्या. परंतु धाराशिव जिल्ह्यात ना सरकारी जमिनी मिळाली, ना रेडीरेकनेर नुसार जमिनी मिळाली नाही. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून म्हाडाचे अधिकारी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांना भेटून जमीन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना कोणीही प्रतिसाद देत नाही. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर च्या गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ च्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष 12 जुलै 2024 जिल्हाधिकाऱ्यांना भेटून म्हाडा गृहनिर्माण योजनेसाठी जिल्ह्याचे मुख्यालय तसेच जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली होती. परंतु त्यांना कोणतीही दाद देण्यात आली नाही. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनाही राबवता येते. त्यासाठी सुध्दा लोकप्रतिनिधींसह अधिकारी वर्ग उदासिन असल्याचे दिसून येत आहे. 

 
Top