धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या तीन चार दिवसांपासून सातल्याने विजांच्या कडकडाटासह मॉन्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. येत्या काही दिवसांत मॉन्सूनचे आगमन होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात वीजसुरक्षेबाबत अधिक सजग राहण्याची गरज आहे. पाणी हे विजेचे चांगले वाहक आहे. त्यामुळे प्रामुख्याने रस्त्यावरील सार्वजनिक वीजयंत्रणा, पथदिव्यांच्या लोखंडी खांबापासून आणि घरगुती वीज उपकरणांपासून विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून केले आहे.

अतिवृष्टी, वादळी पावसामुळे तुटलेल्या वीजतारा, पथदिवे, वीजखांब रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड, विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तू, साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. मुसळधार पाऊस व जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या वीजतारांवर पडतात. वीजखांब वाकतात, वीजतारा तुटतात, लोंबकळत राहतात. अशा वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावध राहावे.


कशी घ्याल काळजी

विजेच्या विविध उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क होऊ देऊ नका. फ्यूज तार म्हणून तांब्याऐवजी ॲल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरा. काही बिघाड झाल्यास वीजपुरवठा तत्काळ खंडित होतो व संभाव्य धोका टळतो. घर किंवा इमारतीवरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना वीज तारांपासून दूर ठेवावे, ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये तसेच विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारी सर्व उपकरणे नेहमी स्वीच बोर्डपासून बंद करावीत. पथदिवे किंवा विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत तसेच त्यास दुचाकी टेकवून ठेवू नयेत.


 
Top