भूम (प्रतिनिधी)- दि. 29 मे रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टी सदृश पावसाने विश्वरूपा नदी वरील पुलाचे काम चालू असल्यामुळे पूलाच्या बाजूला नळी टाकून वाहतूक जाण्यासाठी केलेला तात्पुरता रस्ता वाहून गेल्याने माणकेश्वर बार्शी रस्ता बंद झाला आहे.
तर रात्रीच्या पावसाने चिंचपूर ढगे ते वांगी कडे जाणारा पूलासह रस्ता वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली. मध्यरात्री अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने विश्वरूपा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तीस फुटाच्या आसपास तात्पुरत्या स्वरूपाचा फुल व रस्ता पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी पूर्णपणे अडचण निर्माण झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर मोठी नळी वापरून तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता तयार करावा अशी मागणी यावेळी माणकेश्वर गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. रात्री झालेल्या पावसाने चिंचपूर ढगे ते वांगी रस्ता वरील बाणगंगा नदीतील पुलालगतची बाजु वाहुन गेल्याने सकाळी शेतात जाणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पुला लगतची बाजु वाहुन गेल्याने पुलावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. लवकरात लवकर प्रशासनाने पुलाची पाहणी करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. जर प्रशासनाने दुर्लक्ष केले तर आगामी काळात हा पुल वाहुन जाण्याची शक्यता अधिक आहे. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत हि येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. जर हा प्रश्न प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी नाही सोडवला तर शेतकरी उपोषण करण्याच्या मनस्थितीत आहेत.