धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कार्यालय,उमेद आणि नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त संकल्पनेतून “महिला बचत गट उत्पादने स्वस्त धान्य दुकानाचे दारीं“ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ आज 9 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या हस्ते संपन्न झाला.या उद्घाटन प्रसंगी डॉ.मैनाक घोष (मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद), विलास जाधव (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी), स्वाती शेंडे (जिल्हा पुरवठा अधिकारी), अजित डोके (सहायक आयुक्त, नगरपरिषद प्रशासन विभाग) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 या उपक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील महिला बचत गटांना सक्षम करणे आणि त्यांच्या स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे.या संकल्पनेतून महिलांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या स्वावलंबनाला चालना मिळणार आहे. प्रारंभी प्रायोगिक स्वरूपात धाराशिव येथे तीन रास्त भाव दुकाने  नागेश जगदाळे (दु. क्र.17), प्रदीप गणेश (दु. क्र.21,बाजार चौक) आणि मुदसिरोडीन काजी (दु. क्र.9, गणेशनगर) येथे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी पुजार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष यांनी महिला बचत गटांची उत्पादने खरेदी करत त्यांच्या अडचणी,गरजा व संधी यावर संवाद साधला. रास्त भाव दुकानांमार्फत महिलांना विक्रीसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत त्यांना ग्राहकांशी थेट जोडण्याचा हा उपक्रम पुढे इतर ठिकाणीही राबवण्यात येणार आहे.यावेळी इतरही अधिकारी तसेच उमेद व नागरी उपजीविका अभियानातील महिला बचत गटांच्या महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


 
Top