धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव जिल्ह्यामध्ये पाण्याची कमतरता आहे, ही वस्तुस्थिती खरी आहे. मात्र, कमी पाण्यावर येणारी पिके घेऊन या मालावर प्रक्रिया उद्योग उभा करण्यास मोठा वाव आहे. या माध्यमातून उद्योग व उद्योजक निश्चितपणे यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे औद्योगिक विकासाची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातून करावी, असे आवाहन रुरल चेंबर ऑफ कॉमर्स कॉमर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुईखेडकर यांनी दि.5 एप्रिल रोजी केले.

धाराशिव शहरातील सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सभागृहात क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्व माजी प्राचार्य डॉ रमेश दाबके यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त औद्योगिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, उद्योजक राजशेखर पाटील, प्रज्ञात द्विवेदी, उत्तमराव शिंदे, एस के जारवाल, चेतन पवार, उदयसिंह दळवी व शिवाजी देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे बोलताना घुईखेडकर म्हणाले की, देशात 62 टक्के युवा वर्ग आहे. परंतू 18 ते 40 वर्षे वयोगटातील युवकांच्या हाताला काम नाही.  तर ग्रामीण नागरिकांचे उत्पन्न अत्यल्प असल्यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था डबघाईला आली असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे गुजराती, मारवाडी व राजस्थानी या भागातून आलेला समाज कोट्याधीश झाला मात्र महाराष्ट्रातील समाज दरिद्री झाला असे सांगत ते म्हणाले की, महाराष्ट्रातील नागरिकांना मेहनत करण्याची सवय नाही. विशेष म्हणजे साडेसाती किंवा शनी नाही, पण समाजाने तरुणांची मानसिकता तयार तशी केली असल्याचे सांगत जाती-जातीमध्ये भांडणे लावून त्यांचे आयुष्य बरबाद होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कौशल्य आधारित वर्षभर काम करणारे ग्रामीण भागातील नागरिक आहेत मात्र त्यांची तशी मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी भारतीय संस्कृतीचा जगात धबधबा होता मात्र हल्ली भंडारे भागवत कथा यामध्ये नागरिकांना डुबविण्याचे काम सुरू असून जग मंगळावर गेले असताना आपण कबरी खोदण्यात गुंग असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आपली प्रगती करायची असेल तर सूक्ष्म नियोजन करून उद्योग सुरू केल्यास तुम्हाला कोणीही रोखू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी या भागात काय गरजा आहेत ! त्यामुळे शेतकऱ्यांनी छोट्या मोठ्या कंपन्या स्थापन करून हळद, धने पावडर, मसाले, लोणचे, डाळी आदींसह इतर उत्पादने तयार करावीत त्याच्या विक्रीची जबाबदारी रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया घेणार असल्याची त्यांनी आश्वासन दिले. युवकांनी महाराष्ट्रातील  शेती विकू नका, ती टिकवा. असे सांगत छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मांचे होते. मात्र काही राजकारणी हिंदू-मुस्लिम असा वाद निर्माण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

तर गोरे म्हणाली की, धाराशिव जिल्ह्यात चांगले हवामान आहे. बुद्धिमत्तेच्या बाबतीत हा जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा आहे. तर आर्थिक व सामाजिक वातावरण देखील बिघडलेले नाही. शेतीपूरक व्यवसाय करायचा असेल तर कमी पाणी लागणाऱ्या पीक पद्धतीचा अवलंब करावा अशी आवाहन त्यांनी केले. कमी पाण्यावर बांबूची शेती चांगली होत असून बांबूपासून अनेक उत्पादन तयार होत असल्यामुळे तो उद्योग जिल्ह्याला वाचवेल असे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे पुणे व बेंगलोरच्या धर्तीवर या जिल्ह्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स उद्योग धंद्याला मोठा वाव असून हा जिल्हा या उद्योगाचा हब होऊ शकेल असे त्यांनी सांगितले. तर नानासाहेब पाटील म्हणाले की, मोठा उद्योग व्यवसाय नसल्यामुळे अनेकांची कुटुंबे स्थलांतरित होत असून त्यांना स्थलांतरित होऊ न देता त्यांना उद्योग उभारण्यास मदत केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील युवक आठ-आठ दिवस शिवजयंती आंबेडकर जयंती गणेश उत्सव यामध्ये मग नसतात. तर राजकीय मंडळी मज्जिद मंदिर स्पोर्ट घडविण्यासाठी या तरुणांच्या हाताचा वापर करीत असून तरुणांनी तो वापर न निर्मितीसाठी करावा असे आवाहन केले. तसेच माजी प्राचार्य डॉ दापके यांनी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता छोटे छोटे उद्योग सुरू करून आपली आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी केले. 

तर राजशेखर पाटील म्हणाले की, युवकांनी उद्योगासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेऊन आपल्या शेतीत उत्पादन होणाऱ्या मालावर प्रक्रिया उद्योग उभा करावेत. मात्र यशस्वी उद्योजक होण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनत कशी घ्यावी ? याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रज्ञात द्विवेदी, उत्तमराव शिंदे, एस के जारवाल, चेतन पवार, उदयसिंह दळवी व शिवाजी देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. चर्चा सत्राचे प्रस्ताविक डॉ दिग्गज दाबके देशमुख यांनी तर सूत्रसंचालन प्रा सोमनाथ लांडगे यांनी व उपस्थितांचे आभार फेरोज पल्ला यांनी मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top