नळदुर्ग (प्रतिनिधी)- येडोळा तालुका तुळजापूर येथील ग्रामपंचायत अंतर्गत जखनी तांडा परिसरात उभारण्यात आलेल्या खडी मिक्सर प्रकल्पामुळे तांड्यातील ग्रामस्थांचे जीवन धोक्यात आले आहे. दरम्यान या खडी मिक्सर प्रकल्पात होत असलेल्या भुसुरूंगामुळे तांड्यातील नागरिकांच्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून, याप्रकरणी तांड्यातील काही नागरिक जाब विचारण्यास गेले असता त्यांच्यावरच दबाव तंत्राचा वापर करून त्यांना परत पाठवलं असल्याचे तांड्यातील नागरिकांत बोलले जात आहे. 

सध्या नळदुर्ग शहरात एका इन्फा स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे यांच्याकडून विकास कामे होत आहेत. सुमारे 78 कोटीचे कामे या कंपनीला देण्यात आली असून नळदुर्ग शहरातील विविध ठिकाणी काँक्रीट रस्ते गटार बांधकाम आधी विकासकामे केली जात आहेत. दरम्यान या कामासाठी लागणारे खडी सिमेंट वाळू मिक्स करून कामावर पाठवण्यासाठी जो खडी वाळू सिमेंट मिक्स प्रकल्प तयार करण्यात आला आहे तो जखनी तांडा परिसरात करण्यात आला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन करून त्या ठिकाणी खडी, दगडी वाळू मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जात असून त्याच ठिकाणाहून सिमेंट मिक्स करून जो काँक्रीट रस्त्यासाठी मिक्सिंग करून पाठवला जातो. सध्या नळदुर्ग शहरात या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहेत. दरम्यान कंपनीकडून उभारण्यात आलेल्या जखनी तांडा परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन करून  खडी आणि दगडी वाळू निर्मिती केली जात आहे. दरम्यान यासाठी ग्रामपंचायतीने या प्रकल्प उभारणी साठी ना हरकत दिली असल्याचे सांगण्यात आले आहे,मात्र या प्रकल्पाकडून ग्रामपंचायतीला कोणताही कर भरण्यात आला नाही. शिवाय कोणत्याही कायदेशीर बाबी पूर्ण न करता हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकल्पाच्या जागेत गौण खनिजाचे उत्खनन करीत असताना रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात भूसुरुंग ( ब्लास्टींग ) करण्यात येत आहेत. या भूसुरुंगामुळे तांड्यातील बहुसंख्य नागरिकांच्या घराला तडे गेले असल्याचे तांड्यातील नागरिकांनी सांगितले. दरम्यान या प्रकल्पातील भूसुरुंगामुळे तांड्यातील नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता असल्याने आणि रात्रभर भूसुरुंग करीत असल्याने त्याचा उडणारा धुरळा या मुळे नागरिकांना होणारा त्रास पाहून काहीं नागरिक हा प्रकल्प बंद करा अशी मागणी करीत प्रकल्पा मध्ये गेले असता त्यांना काहीं गुंडा करवी दमदाटी करून त्यांना तेथून हाकलून दिले असल्याचे ही या वेळी नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पाच्या पाठीमागे मोठ्या बड्या हास्तीचा हात, आशीर्वाद असून हा आशीर्वाद असणारा आका कोण आहे, हे शोधणे गरजेचे आहे. कारण नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता असणाऱ्या या प्रकल्पातील लोकांकडून तांड्यातील नागरिकांवर दमदाटी केली जात आहे. दरम्यान ग्रामपंचायतीचा व शासनाचा मोठ्या प्रमाणात कर बुडवून हा प्रकल्प राजरोसपणे चालवला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, दरम्यान जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात आपल्या अधिकाऱ्यांमार्फत या प्रकल्पाची चौकशी करून संबंधित प्रकल्पा कडून ग्रामपंचायतीला कर भरला आहे का, रॉयल्टी भरली आहे का, रॉयल्टी किती भरली जावी या सर्व बाबीची सखोल चौकशी करून नागरिकांना होणारा त्रास, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असेल तर तत्काळ हा प्रकल्प बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी द्यावे अशी मागणी ही तांड्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.


 
Top