धाराशिव - धाराशिव शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. रस्त्यावरील खड्डयामुळे अनेकांचा बळी गेला तर अनेकजण जायबंदी झाले. सततच्या अशा प्रकारांमुळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी व संतप्त धाराशिवकरांनी मंगळवारी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. त्यानंतर नरमलेल्या नगर परिषद प्रशासनाने तब्बल नऊ महिने रखडलेली निविदा प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण करुन 28 फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्षात कामे सुरु करण्याचे लेखी आश्वासन नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिले.
नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव नगरपालिकेला शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी 140 कोटी (59 डिपी रस्ते) रुपये खर्चाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्राप्त झालेली असून, त्यामध्ये प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर सात दिवसांच्या कालावधीत निविदा काढणे व तीन महिन्यांच्या कालावधीत कार्यारंभ आदेश देणे व प्रत्यक्षात कामे सुरू करणे बंधनकारक आहे. शहरात धाराशिवचे नेते म्हणविणाऱ्या भाजपा आमदार राणा पाटील यांनी मोठमोठे होर्डिंग लावून धाराशिव शहर बदलतंय अशी जाहिरातबाजी केली. परंतु प्रत्यक्षात कामे कोण अडवली? याची माहिती जनतेला सांगावी असे आव्हान देण्यात आले होते. मंगळवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन नरमलेल्या नगर परिषद प्रशासनाने रखडलेली निविदा प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण करुन 28 फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्षात कामे सुरु करण्याचे लेखी आश्वासन नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर आंदोलनाची नौटंकी- साळुंके
धाराशिव शहरातील भुयारी गटार योजनेमुळेच रस्त्यांचा सत्यानाश झाला. या रस्त्यांच्या कामासाठी 140 कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून घेतल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत असताना विरोधकांनी आंदोलनाची नौटंकी सुरु केली असल्याचा घणाघात शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या या नौटंकीला सूज्ञ धाराशिवकर जनता भीक घालणार नाही, असा टोलाही जिल्हाप्रमुख साळुंके यांनी लगावला आहे.