धाराशिव (प्रतिनिधी)- अपघाताध्ये सर्वसामान्यांचे जाणारे बळी रोखून वाहतूक सुरळीत व्हावी याकरिता सर्विस रोड व अंडरपासच्या मागणीसाठी निवेदने देऊन पाठपुरावा करुन तसेच आंदोलन करुनही एनएचएआय व आयआरबीने टाळाटाळ केल्यामुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच शालेय विद्यार्थ्याला घरी जात असताना अपघातात जीव गमवावा लागला. त्यामुळे संतप्त पालक व नागरिकांनी गुरुवारी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (दि.12) डी-मार्टसमोर रास्तारोको आंदोलन करुन एनएचएआय व आयआरबीच्या कारभारावर रोष व्यक्त केला. कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत रास्तारोको सुरुच ठेवणार अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. तर काहींनी रस्ता उखडून टाकण्याचा इशाराही यावेळी दिला. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून एक तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. एनएचएआयच्या वतीने 25 डिसेंबरपर्यंत सर्विस रोडचे डांबरीकरण पूर्ण करण्याचे लेखी कळविल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
धाराशिव शहरातील डी-मार्ट ते आयुर्वेद कॉलेजपर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुला सर्विस रोडचे काम सुरु करण्यात आलेले आहे. या मार्गावर पोदार शाळा, डी-मार्ट आणि नागरी वसाहत असल्यामुळे मोठी वर्दळ असते. सर्विस रोड करण्यापूर्वी सिमेंट-काँक्रीटच्या नाल्या बनविण्यात येत आहेत. या कामापूर्वी सर्विस रोडसाठी नियमानुसार जागा सोडणे आवश्यक आहे. परंतु विविध ठिकाणी सर्विस रोडची रुंदी कमी दिसून येते. त्याचप्रमाणे पोदार शाळेजवळ विकास नगर येथे व जुना उपळा रोड येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूने लहान चारचाकी वाहने जातील असे दोन अंडरपास करणे गरजेचे असताना त्याकडे विविध तांत्रिक कारणे देऊन विलंब व टाळाटाळ केली जात आहे.
यावेळी शिवसेना गटनेते सोमनाथ गुरव, राष्ट्रवादी काँग्रेसचे मसुद शेख, काँग्रेसचे खलील सय्यद, उमेश राजे, पृथ्वीराज चिलवंत, धनंजय शिंगाडे आदींनी मनोगत व्यक्त करताना एनएचएआय व आयआरबीच्या कारभारावर सडकून टिका करत काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली.
महिलांचा आंदोलनादरम्यान आक्रोश
आंदोलनात विद्यार्थ्यांसह महिला पालक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी अपघातात विद्यार्थ्याने जीव गमावल्यामुळे आधीच संतप्त झालेल्या महिलांनी आंदोलनस्थळी आक्रोश व्यक्त केला. त्यामुळे आंदोलनात सहभागी पालकांचे डोळेही पाणावले होते.
..तर काम पूर्ण होईपर्यंत महामार्ग अडविणार!
ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. त्यास पोलिसांनी अटक का केली नाही, असा संतप्त सवाल पालकांनी केला. 15 दिवसांत काम पूर्ण न झाल्यास संपूर्ण महामार्ग अडवून ठेवू. यापुढे असे पाऊल उचलू की त्यांना हे कामच पूर्ण करावे लागेल, असा इशारा देत उपळा (मा) गावच्या सरपंचांनी टोल नाके बंद करण्याची मागणीही केली.