धाराशिव (प्रतिनिधी)-भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा हैदराबाद संस्थानात निजामशाही चालू होती. त्याविरोधात मराठवाड्यातील व एकूणच हैदराबाद संस्थानातील क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यलढा चालवला. यात कित्येकांना प्राणाला मुकावे लागले, कित्येकांच्या घरादाराची राखरांगोळी झाली. गावंच्या गावं जळून बेचिराख झाली. या लढ्याला भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ॲक्शनच्या माध्यमातून महत्वपूर्ण भूमिका घेत निजामशाही उलथून टाकून हैदराबाद संस्थान मुक्त केले. नुकताच त्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. या सर्व लढ्यातून तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्ती संग्राम दिवस म्हणून साजरा करावा अशी स्वातंत्र्य सैनिकांसह जनतेची ही मागणी होती. याचा गांभीर्याने विचार करुन केंद्र सरकारने 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्तीसंग्राम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. तशी अधिसूचना देखील दि. 12 मार्च रोजी प्रसिद्ध केली आहे. त्याबद्दल केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह सर्व शासन प्रशासन यंत्रणेचे मराठवाडा मुक्तीसंग्राम संयोजक युवराज नळे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


 
Top