धाराशिव (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील शेलगाव येथील सुभाष भुजंग तवले यांचा दि.19-20 जुलैच्या दरम्यान धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला आहे. मात्र येरमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील हे तपास करण्यासाठी निष्क्रीय ठरले आहेत. त्यामुळे हा तपास सीआयडीकडे देण्यात यावा या मागणीसाठी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढीत हा तपास सीआयडीकडे देण्यात यावा, अशी मागणी दि.23 ऑगस्ट रोजी केली. यामध्ये गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कळंब तालुक्यातील शेलगाव येथील सुभाष भुजंग तवले (वय- 40 वर्षे) या तरुणाचा दि. 19-20 जुलै 2023 च्या पहाटे 6.45 वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला आहे. हा प्रकार सात वाजण्याच्या सुमारास त्याचे वडील भुजंग यांना समजल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून शेलगाव येथील रविंद्र लिंबराज तवले (वय- 36 वर्षे) याच्या विरुद्ध गुरनं 227/2023 कलम 320 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातून कुऱ्हाड जप्त केली आहे. या आरोपीला निर्दोष मुक्तता व्हावी व तपासा दरम्यान काहीतरी जप्त केलेले असावे म्हणून नाममात्र कार्य आहे असे स्पष्ट दिसून येते आहे. कारण त्या कुऱ्हाडीचा व या खुनाचा कसलाही संबंध नाही व या घटनेचा आरोपीला फायदा मिळणार आहे.
मात्र गुन्हा घडवून एक महिन्याचा कालावधी लोटला असताना आरोपी रविंद्र तवले याच्यासोबत असलेले इतर साथीदारांचा अद्यापपर्यंत तपास केलेला नाही. याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील यांच्याकडून हा तपास काढून सीआयडीकडे देण्यात यावा या मागणीसाठी गावकऱ्यांनी हा मोर्चा काढला. यावेळी मयत संतोष तवले यांचे वडील, भाऊ व गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या मूक मोर्चामध्ये गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कुटुंबियांनी आम्ही दहशतीखाली वावरत असून आरोपींपासून आम्हाला धोका असल्यामुळे त्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रसार माध्यमांसमोर केली.