धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हा दुष्काळ देखरेख समितीची व जिल्ह्यातील टँकर व अधिग्रहणाबाबतची स्थिती, सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा व उपयुक्त पाणीसाठ्याची सद्यस्थिती बाबतची बैठक घेण्यात आली असून, पाटबंधारे प्रकल्पातील 10.06 टक्के पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या बाबत आढावा घेण्यात आला असता संबंधित पाटबंधारे विभागाचे प्रमुख यांनी जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम, लघू असे प्रकल्प, साठवण तलाव, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे यामध्ये सरासरी उपयुक्त पाणीसाठा 10.06 टक्के एवढा आहे व या प्रकल्पातील पाणीसाठा हा पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षित केला असे जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी सांगितले आहे.


भरारी पथकाची नियुक्ती

संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने, जिल्ह्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्पात सद्यस्थितीत उपलब्ध असलेले पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्पातील अनाधिकृत पाणी उपसा होवू नये याकरिता सर्व तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय महसूल मंडळ निहाय भरारी पथक गठीत करण्यात आले आहे. तालुकास्तरीय भरारी पथकात कार्यालयातील एक नायब तहसीलदार, संबधित महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी, संबधित सज्जाचे तलाठी, संबंधित प्रकल्पाचे शाखा अभियंता, महावितरण कंपनीचे संबंधित अभियंता,संबंधित कार्यक्षेत्रातील पोलिस उपनिरिक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


 
Top