उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील गालिबनगर भागामध्ये रस्ते, नालीअभावी नागरिकांना पावसाळ्यात जिवंतपणी मरणयातना भोगाव्या लागत असल्याने याकडे डोळेझाक करणार्‍या प्रशासनाला जाग यावी म्हणून शिवसेनेचे उपशहरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत साळुंके यांच्या पुढाकारातून  गालिबनगर येथील बिलाल मस्जीदसमोर स्थानिक रहिवाशांच्या स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला नागरी समस्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी नागरिकांनी गालिबनगर परिसरातील समस्यांचा पाढा वाचून दाखविला.

 यावेळी बोलताना शिवसेनेचे उपशहरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत   साळुंके म्हणाले की, या भागातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी आम्ही नगर परिषद, तहसिलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदने देऊन, आंदोलने केली. तरी सुद्धा प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे उच्च न्यायालयात दिवाणी याचिका दाखल केली. त्यानंतर प्रशासनाने काही भागात कामे हाती घेतली. परंतु इथल्या अनेक समस्या अद्याप कायम आहेत. त्यामुळे गालिबनगर परिसर नागरी समस्यामुक्त करण्यासाठी आज बिलाल मशिदीसमोर स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर या भागातील शेकडो नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होऊन प्रशासनाविरोधात असलेला रोष व्यक्त केला.

 प्रशासनाने अजूनही दखल नाही घेतल्यास आगामी काळात उग्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे उपशहरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत   साळुंके यांनी दिला आहे. यावेळी गालिबनगर येथील समस्याग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top