उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

येणेगुर, (ता. उमरगा)  ग्रामस्थ- मनिषा अजय माळी,(25)  या कुटूंबीयांसह  आपल्या घरात झोपलेल्या होत्या. दरम्यान अंगात काळे कपडे व तोंडावर मास्क घातलेल्या तीन अनोळखी परुषांनी माळी यांच्या घराचा मागील दरवाजा उचकटुन आत प्रवेश केला. या आवाजाने मनीषा माळी जागी झाल्या असता त्या तीघांनी मनीषा यांना चाकुचा धाक दाखवून कपाटातील सुवर्ण व चांदीचे दागिने व 9,500 ₹ रोख रक्कम असा एकुण 3,16,035 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला होता. यावरुन मनिषा माळी यांनी मुरुम पो.ठा. येथे गु.र.क्र. 142 / 2022 हा भा.दं.सं. कलम- 392, 457 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

  गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व  अपर पोलीस अधीक्षक  नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुम पोलीसांनी गतीमान तपास करुन गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा व कौशल्यपुर्ण तपास केला असता प्रत्यक्षात चोरी झालेली नसून प्रथम खबरी- मनिषा माळी यांनीच नमूद ऐवज  लपवून चोरीचा कांगावा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करुन चोरीचे दागिने जप्त केले होते. ते जप्त दागिने मा. न्यायालयाच्या आदेशाने  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सुचनेप्रमाणे मुरुम पो.ठा. चे सपोनि- आर.एम. जगताप यांनी मनिषा यांचे सासु- सासरे- जगदेवी माळी व अरविंद माळी यांना परत केले असुन दागिने परत मिळाल्याने त्या दोघांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले.

 
Top