उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्य शासनाने कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास दिले आहेत.त्यामुळे जिल्हयातील शाळा टप्पा टप्पाने सुरु करण्यात येत आहेत.यापूर्वी जिल्हयात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास मान्यता दिली आहे.आज पहिली ते आठवीपर्यंतचे सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील वर्ग येत्या 7 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी परवानगी दिली आहे.

  राज्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य शासनाने 8 जानेवारी 2022 रोजी राज्यातील शाळा 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.राज्यातील ज्या भागात कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी आहे.अशा भागातील शाळा सुरु करण्याचे अधिकार जिल्हास्तरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.त्या अनुषंगाने यापूर्वी जिल्हयातील सर्व माध्यमाच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांतील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत.

 दरम्यान,जिल्हयातील कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.त्यामुळे हे वर्ग सुरु झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थी,शिक्षक कोरोना पॅझीटिव्ह आढळून आल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या शिफारस अहवाल गटविकास अधिकारी यांना सादर करावयाचा आहे.तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून याबाबत उचित निर्णय घ्यावयाचा आहे,असेही या आदेशात म्हटले आहे.

 शाळा सुरु करण्यापूर्वी आणि शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य,स्वच्छता आणि कोरोना सुरक्षाविषयक उपाय योजनांबाबत मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करवयाचे आहे.गटशिक्षणाधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख यांनी नियमितपणे शाळांना भेटी देऊन आढावा घ्यावयाचा आहे.आणि आवश्यक ते मार्गदर्शन करुन त्याबाबतचा अहवाल नियमित जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरणास पाठवावयाचा आहे.

 
Top