उस्मानाबाद/ प्रतिनिधी -

 कळंब तालुक्यातील २ ठिकाणच्या रस्त्यांच्या कामासाठी आणि एका गावालगतच्या पुलाच्या बांधकामासाठी नाबार्ड अंतर्गत ४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्ता व पुलाच्या कामांना निधी उपलब्ध करून दयावा, यासाठी आ. कैलास पाटील यांनी प्रयत्न केले. 

आ. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर करण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील बहुला- इटकूर- मांडवा आणि मंगरुळ- खामसवाडी- तडवळा रोड या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तर डोंगरेवाडी पिंपळगाव -बावी- परतापूर- दहिफळ या रस्त्यावरील दहिफळजवळ पुलाअभावी ग्रामस्थांना वाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या रस्त्याच्या कामासाठी व पुलासाठी तेथील ग्रामस्थांकडून अनेकवेळा पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र यासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत होते. याबाबत लेथील ग्रामस्थांनी आमदार घाडगे- पाटील यांच्याकडे रस्त्याच्या कामासाठी व दहिफळजवळच्या पुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आ. पाटील यांनी या रस्त्यांच्या कामांना आणि पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यानुसार बहुला -इटकूर- मांडवा या रस्त्यावरील इटकूरपासून ३ किलोमीटरपर्यंतचा रस्ता करण्यासाठी २ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय राज्यमार्गापासून मंगरुळ, खामसवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दहिफळजवळील पुलाच्या बांधकामासाठी १ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


 
Top