पंतप्रधानांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आपल्या देशातील कायदे हे समान आहेत. कायद्यामध्ये भेदभाव होऊ शकत नाही. घटना घडल्यानंतर त्यावर विचार करण्यापेक्षा अगोदरच त्यावर उपाय आपल्याला शोधता येतो. हक्क आणि अधिकार याविषयी जाणीव जागृती व्हावी यासाठी हा उपक्रम आहे. महिलावरील अत्याचार विरुद्ध कायद्यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद आहे. लिंग निदान करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. अन्याय सहन करणे हे चुकीचे असल्याचे सांगून छोटे छोटे वाद कुटुंबामध्ये एकत्र बसून चर्चा केल्यास ते मिटतात. कोर्टाची पायरी चढावी लागत नाही, असे सांगून पुढील वर्षी निश्चितपणे अनदुरला लोकअदालत घेतला जाईल असे न्यायाधीश अवघडे यांनी सांगितले
विधी सेवा समिती तुळजापूर यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 2 ऑक्टोबर 2021 पासून 14 नोव्हेंबर 2021 पर्यत मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली, मा राज्य सेवा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांचे निर्देशाशानुसार विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. रविवार दिनांक 17/10/2021 रोजी सकाळी 11 वाजता प्रभात मंडळाच्या सभागृहात येथे मा. श्री वि.आ.अवघडे दिवाणी न्यायाधीश क स्तर, तुळजापूर यांच्या अध्यक्षतेखाली व श्री राऊत पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे नळदुर्ग, ऍड जयवंत इंगळे अध्यक्ष विधिज्ञ मंडळ तुळजापूर यांच्या प्रमुख उपस्थित मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले . यावेळी अध्यक्ष विधी सेवा समिती तुळजापूर तथा दिवाणी न्यायाधीश श्री वि. आ. अवघडे यांनी विधी सेवा समिती मार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत विधी सेवेबाबतची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. त्याचप्रमाणे विधी सेवा प्राधिकरणामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवेचा लाभ घेण्यासाठी कार्यपद्धतीचा कसा अवलंब करता येईल, विधी सेवा मिळविण्यासाठी कोण पात्र आहे याबाबतची सविस्तर माहिती शिबिरास उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना दिली.व्यासपीठावर तुळजापूर विधीज्ञ , अॅड. निलकंठ वटटे, अॅड. किरण कुलकर्णी, अॅड सुरेश कुलकर्णी, अॅड. प्रबुद्ध कांबळे, पोलीस निरीक्षक राऊत, विधी सेवा पॅनल सदस्य ऍड एस डी लोंढे उपस्थित होते.
यावेळी अॅड वटटे, अॅड सुरेश कुलकर्णी , अॅड किरण कुलकर्णी यांनी आपले विचार सर्वासमोर मांडले. प्रास्ताविक अॅड वटटे व सूत्रसंचालन अॅड किरण कुलकर्णी व ग्राम विकास अधिकारी डी.ए.चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे, उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण घाेडके पाटील, डॉ. विवेक बिराजदार, डॉ. अशोक चिंचोले यांच्यासह बहुसंख्य महिला, नागरिक उपस्थित होते.