उस्मानाबाद / प्रतिनिधी

कोरोणामुळे पालक गमावलेल्या मुलांची काळजी घेण्याची गरज आहे . महिला व बाल विकास विभागाबरोबरच इतर शासकीय विभागांनी त्यांच्याकडील योजनांचा लाभ देऊन मदत करावी तसेच जिल्हयातील वन स्टॉप सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी कोवीड-19 मुळे विधवा झालेल्या 1014 महिलाची गृहभेट घेऊन त्यांच्यावर होणाऱ्या कौंटुबिक छळाबाबतची माहिती घेणे, या महिलांचे सातबारा उताऱ्यावर व इतर मालमता मध्ये नांव आहे किंवा कसे याबाबत माहिती घेणे तसेच त्यांना शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ पाहिजे आहे. याबाबत या विधवा महिलांचे समुपदेशन करुन त्यांचे मनोबल वाढवावे . या  महिलांना महसूल विभागांच्या ज्या योजना आहेत, त्या सर्व योजनांचा  या महिलांना लाभ देण्याची आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत 20000 रुपयांची मदत करण्याची कार्यवाही  तहसीलदार यांनी करावी,असे आदेश जिल्हाधिकारी तथा वन स्टॉप सेंटरचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले  आहे.

 महिला व बाल विकास विभागांच्या  7 मे 2021 च्या शासन निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार कोविड 19 मुळे पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काल  झाली,त्यावेळी ते बोलत होते.

 कोवीड 19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालंकाना अनाथ प्रमाणपत्र मिळवून देण्याबाबत बाल कल्याण समितीने  कार्यवाही करावी. तसेच जिल्हयात एक पालक गमावलेल्या बालकांना सर्व न.पा.च्या मुख्याधिकारी आणि ग्रामसेवक यांनी या बालकांच्या पालकांचे मृत्यू दाखले मिळवून देण्याबाबत कार्यवाही करावी.ज्या बालकांना अभियांत्रिकी  शाखेत प्रवेश गुणानुक्रमे प्रवेश मिळत नाही, त्यांना अभियांत्रिकी महाविद्यालययात प्रवेश मिळवून  देण्यासाठी कार्यवाही करता येईल,यासाठीही प्रयत्न करावेत,असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

 जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्या सचिव जिल्हास्तरीय कृती दल समिती यांनी “जिल्हयात एक पालक तसेच दोन पालक गमावलेल्या अशा 108 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ दिलेला आहे. उर्वरित बालकांची माहिती संकलीत करुन त्यांनाही या योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याबाबतचे सांगितली.तसेच दोन्ही पालक गमावलेल्या पाच बालकांना पाच लाख रुपये  मिळवून देण्याबाबत शासनास प्रस्ताव पाठवण्यास मंजुरी देण्यात आली आहे .विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या पाच बालकांच्या मालमत्ताबाबत माहिती घेवून या बालकांच्या मालमत्तेचा हक्क मिळवून देण्याबाबत विधी तज्ज्ञांची समिती तयार करण्यात असल्याचे बैठकीत सांगितले.

 या बैठकीस विधी प्राधिकरण्याचे सचिव न्यायाधीश  श्री.घाडगे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे,पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी पोलीस निरिक्षक एस.एस.बाबर,बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अश्रुबा कदम,तुळजापूर,वाशी,भूम,परंडा या तालुक्याचे मुख्यधिकारी ,जिल्हा परिविक्षा अधिकारी शिरीष शेळके,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती कोमल धनवडे आदी उपस्थित होते.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा कृती दल समिती बी.एच.निपाणीकर यांनी आभार मानले.


 
Top